देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील याचिकेवर ८ सप्टेंबरला निकाल !

निवडणूक शपथपत्रात २ गुन्ह्यांची नोंद नसल्याचे प्रकरण

नागपूर – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्ष २०१४ मधील निवडणूक शपथपत्रात २ गुन्ह्यांची नोंद नसलेल्या प्रकरणाची सुनावणी ५ सप्टेंबर या दिवशी होणार होती; परंतु न्यायालयाने निकालाचा दिनांक ८ सप्टेंबर असा निश्‍चित केला आहे. अधिवक्ता सतीश उके यांनी फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका प्रविष्ट केली आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे.

१. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील पहिली तक्रार ही अपकीर्ती केल्याच्या गुन्ह्याच्या (क्रिमिनल डिफेमेशन) संदर्भातील आहे. फडणवीस नगरसेवक असतांना त्यांनी एका सरकारी अधिवक्त्यांविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. ‘त्या खटल्यातून दूर करण्यात यावे’, अशी मागणी करणारे प्रसिद्धीपत्रक त्यांनी काढले होते. त्यावर अधिवक्त्याने ‘क्रिमिनल डिफेमेशन’ प्रविष्ट केले. नंतर त्यांनी ते परतही घेतले आहे.

२. दुसरे प्रकरण एका झोपडपट्टीवासियांसाठी आंदोलन करतांनाचे आहे. ‘एका जागेवरील  झोपडपट्टीला ‘मालमत्ता कर’ लावण्यात यावा’, असे पत्र तत्कालीन नगरसेवक फडणवीस यांनी महानगरपालिकेला दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी कृती केली. यावर एका व्यक्तीने ‘ती भूमी खासगी असून माझ्या मालकीची आहे’, अशी तक्रार केली होती. नंतर ही तक्रार उच्च न्यायालयाने फेटाळली.