पूर्वीच्या सरकारांचा ‘इस्रो’वर विश्‍वास नव्हता ! – माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन्

माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन्

बेंगळुरू – पूर्वीच्या सरकारांचा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेवर (इस्रोवर) विश्‍वास नव्हता, असा दावा ‘इस्रो’चे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांनी केला आहे. नंबी नारायणन् यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. तसेच पूर्वीच्या सरकारांच्या अर्थसंकल्पात  ‘इस्रो’साठीची आर्थिक तरतूद अतिशय मर्यादित होती, असे नंबी नारायणन यांनी मुलाखतीच्या वेळी सांगितले. ‘राजकीय पक्ष चंद्रयान-३ मोहिमेच्या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यावर तुमचे काय म्हणणे आहे ?’, असा प्रश्‍न नंबी नारायणन् यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलतांना त्यांनी हा दावा केला.

राष्ट्रीय प्रकल्पाचे श्रेय पंतप्रधानांना जात नसेल तर कोणाकडे ?

चंद्रयान-३ मोहिमेच्या यशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले श्रेय लाटण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नाविषयी बोलतांना नंबी नारायणन् म्हणाले की, ‘मोहिमेच्या यशाचे संपूर्ण श्रेय इस्रोचे अध्यक्ष एस्. सोमनाथ यांना जाते. तसेच याचे श्रेय पंतप्रधानांनाही जाते. काहींना पंतप्रधान आवडत नसतील, तरी याचा अर्थ असा होत नाही की, त्याचे श्रेय त्यांना देणार नाही. राष्ट्रीय प्रकल्पाचे श्रेय पंतप्रधानांना द्यायचे नसेल, तर अन्य कुणाला देणार ?