जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३ भारतीय सैनिकांना वीरमरण !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – केंद्रशासित प्रदेशातील कुलगाम जिल्ह्यात ५ ऑगस्ट या दिवशी जिहादी आतंकवाद्यांशी उडालेल्या चकमकीत ३ सैनिकांना वीरगती प्राप्त झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षादलांना दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात काही आतंकवादी आले असल्याची सूचना मिळाली होती.

या घटनेसंदर्भात भारतीय सैन्याने ट्वीट करत म्हटले, ‘‘कुलगाम येथील हालनच्या उंच डोंगरावर आतंकवादी लपले आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर सैनिकांनी शोधमोहीम चालू केली. आतंकवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केला. त्यांना प्रत्युत्तर देत असतांना ३ सैनिक घायाळ झाले. त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. शोधमोहीम मात्र अजूनही चालू आहे.’’

गेल्या काही मासांत जम्मू-काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांच्या कारवायांत वाढ !

याआधी एप्रिल आणि मे या मासांत पूंछ अन् राजौरी या २ जिल्ह्यांत झालेल्या चकमकीत १० सैनिकांना वीरमरण आले होते. या वर्षाच्या आरंभीच राजौरीमध्ये आतंकवाद्यांनी काही हिंदु कुटुंबांवर आक्रमण केले होते. या घटनेत ७ नागरिक ठार झाले, तर १२ हून अधिक लोक घायाळ झाले होते.

संपादकीय भूमिका

एकीकडे पाकचे पंतप्रधान भारताला चर्चा करण्याचे आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे आतंकवादी पाठवून भारतीय सैनिकांना ठार मारत आहेत. अशा धूर्त पाकला आता कायमचा धडा शिकवण्यासाठी भारत सरकार काही करणार कि नाही ?