‘जय श्रीराम’ लिहिलेली भगवी पट्टी घालून येणार्‍या विद्यार्थ्‍यास महाविद्यालयाकडून दमदाटी !

प्रतिकात्मक चित्र

कोल्‍हापूर – शहरातील एका महाविद्यालयातील वाणिज्‍य शाखेच्‍या पहिल्‍या वर्गात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्‍याला ‘जय श्रीराम’ लिहिलेली भगवी पट्टी गळ्‍यात घातली म्‍हणून वर्गातून बाहेर काढण्‍याचा प्रकार झाला होता. या प्रकरणी विद्यार्थी आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी आंदोलन केल्‍यावर संबंधित शिक्षकाने क्षमायाचना केली होती; मात्र दुसर्‍या दिवशी लगेचच संबंधित विद्यार्थ्‍यास महाविद्यालय प्रशासनाने कार्यालयात बोलवून दमदाटी केली. ‘तू ऑनलाईन प्रवेश घेतला आहेस. अजून शुल्‍क भरलेले नाहीस, बर्‍याच गोष्‍टी आमच्‍या हातात असतात’, असे सांगून त्‍याला धमकवण्‍याचा प्रकार केला. ही गोष्‍ट हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. संभाजी साळुंखे यांना कळाल्‍यावर त्‍यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन प्राचार्य आणि शिक्षक यांना, ‘दबाव आणण्‍याचा प्रयत्न केल्‍यास आम्‍हाला कठोर भूमिका घ्‍यावी लागेल’, असे सुनावले.

दुसर्‍या दिवशी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये; म्‍हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला होता. श्री. संभाजी साळुंखे यांनी पोलिसांसमोरच प्राचार्य आणि शिक्षक यांना जाब विचारला. ‘भगवी पट्टी घालून येणार्‍या विद्यार्थ्‍यास शुल्‍क भरणे’, तसेच अन्‍य कोणत्‍याही कारणावरून त्रास देण्‍याचा प्रयत्न केल्‍यास आम्‍हीही शांत रहाणार नाही, अशी चेतावणी साळुंखे यांनी दिली.

हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्ते आणि भगवी पट्टी घालणारा संबंधित विद्यार्थी महाविद्यालयाच्‍या परिसरात असतांना काही पत्रकार तिथे आले. त्‍या वेळी एका स्‍थानिक वृत्तवाहिनीच्‍या पत्रकारास पोलिसांनी चित्रीकरण करण्‍यावरून रोखले. या वेळी संबंधित पत्रकाराने ‘मी माझे काम करत आहे, तुम्‍हाला यात हस्‍तक्षेप करण्‍याचा अधिकार नाही’, असे सांगितले. यानंतर तेथे उपस्‍थित असणार्‍या वरिष्‍ठ पोलीस अधिकार्‍यांनी मध्‍यस्‍ती केल्‍याने प्रकरण शांत झाले. एकूणच हे प्रकरण प्रसिद्धीमाध्‍यमांसमोर न येण्‍यासाठी महाविद्यालय प्रशासन आणि पोलीस दोघेही प्रयत्नशील असल्‍याचे दिसले. (अशी भूमिका घेऊन पोलीस काय साध्‍य करत आहेत ?  हिंदूंवर होणारे अन्‍याय प्रसिद्धी माध्‍यमांसमोर यायला नको, असा प्रयत्न पोलीस करत असतील, तर पत्रकारांनाही कठोर भूमिका घेऊन सत्‍य बाजू जनतेसमोर आणायला हवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका : 

  • हिंदुबहुल देशात हिंदूंचीच मुस्‍कटदाबी !
  • गळ्‍यात भगवी पट्टी घालणार्‍यांना महाविद्यालय प्रशासन दमदाटी करत असेल, तर अशा प्रशासनाला पालकांनीही वैध मार्गाने जाब विचारणे आवश्‍यक !