१०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचे उच्चस्तरीय अन्वेषण करा ! – विश्‍व हिंदु परिषद आणि साधू-संत यांची पत्रकार परिषदेत मागणी

पत्रकार परिषदेत सहभागी विश्‍व हिंदु परिषदेचे पदाधिकारी आणि साधू-संत

बेळगाव – येथील १०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचे उच्चस्तरीय अन्वेषण करावे, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषद आणि साधू-संत यांनी ११ जुलैला कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत केली.

या प्रसंगी विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. कृष्णा भट्ट म्हणाले, ‘‘जिहादी प्रवृत्तीचा सखोल अभ्यास केला पाहिजे. येणार्‍या काळात हिंदूंचे रक्षण करणे आपल्या सर्वांच्या हातात आहे. हिंदू घरात बसले, तर हिंदु धर्म टिकणार नाही. जैन मुनींची हत्या निंदनीय असून आता तरी जागे होऊन हिंदूंचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे.’’ या प्रसंगी केदारपिठाच्या मुत्नाळ शाखेतील पू. शिवानंद शिवाचार्य स्वामीजी, आनंदा करलिंगन्नवर, रविराज, सीमा हणमण्णावर आदी उपस्थित होते.

हत्येच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा !

विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढण्यात आलेला मोर्चा

१०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने कित्तूर चन्नम्मा चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या वेळी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी नंदीपर्वत जैन आश्रमाचे १०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येच्या मागे जिहादी प्रवृत्तीच्या संघटनांचा हात असण्याची शक्यता आहे. तरी सरकारने याची गंभीर नोंद घेऊन दोषींना कठोर शिक्षा करावी.

या प्रसंगी कारंजीमठाचे प.पू. गुरुसिद्धस्वामीजी, गणेशपूर येथील रुद्राकेसरी मठाचे श्री हरिगुरु महाराज, श्रीक्षेत्र गनिकोप येथील गंगाधर स्वामीजी, विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. श्रीकांत कदम, प्रांत कोषाध्यक्ष श्री. कृष्णा भट, जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रमोदकुमार वकुंमदमठ, सर्वश्री उमेश चिंडक, अधिवक्ता रविराज पाटील, विनोद डोडणावर, प्रवीण खोडी, सीमा हनमानवर यांसह जैन, हिंदु बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.