वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी ‘धर्मजागृती’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले तेजस्वी विचार !

कलम ३७० हटवूनही काश्मीरमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत ! – राहुल कौल, अध्यक्ष, यूथ फॉर पनून काश्मीर, पुणे

श्री. राहुल कौल

रामनाथी, १७ जून (वार्ता.) – अद्यापही सरकार काश्मिरी हिंदूंचा नरसंहार मान्य करायला सिद्ध नाही. त्याचा परिणाम म्हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, तेथे ‘काश्मिरी पॅटर्न’ राबवला जात आहे. जोपर्यंत काश्मीरमधील नरसंहार मान्य केला जात नाही, तोपर्यंत काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्य नाही. हा केवळ काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाचा विषय नाही, तर देशात ६० हून अधिक ठिकाणी ‘काश्मिरी पॅटर्न’ वापरून इस्लामी जिहादी डोके वर काढत आहेत. ज्या काश्मीरने भारताला भरतमुनी दिले, तो काश्मीर आज हिंदूमुक्त झाला आहे. काश्मिरी हिंदूंचा नरसंहार नाकारल्याचा हा परिणाम आहे. सद्यःस्थितीत काश्मीरमधील ९९ टक्के मुसलमान जिहादी विचारांचे आहेत. वर्ष १९५९ मध्ये नरसंहाराविषयीचा कायदा संसदेत पारित करण्यात आला; मात्र अद्यापही तो अद्यापही लागू झालेला नाही. भारतातील हिंदु धर्म नष्ट करायचा असेल, तर प्रथम येथील संस्कृती नष्ट करायला हवी, जिहाद्यांनी ओळखले आहे. काश्मिरी हिंदूंवर आक्रमण हे भारताची संस्कृती नष्ट करण्यासाठी करण्यात आले आहे. मागील १ सहस्र वर्षे काश्मिरी हिंदूंवर इस्लामी आक्रमणे होत आहेत, वर्ष १९९० मध्ये काश्मिरी हिंदूंचे ७ वे पलायन होते. येथील ३७० कलम हटवण्यात येऊनही अद्यापही काश्मीर हिंदूंसाठी सुरक्षित नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे परखड उद्गार पुणे येथील ‘यूथ फॉर पनून काश्मीर’चे अध्यक्ष राहुल कौल यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी (१७.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.

या वेळी व्यासपिठावर राजस्थान येथील ‘संयुक्त भारतीय धर्म संसद’चे राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य राजेश्वर, बेंगळुरु (कर्नाटक) येथील श्री. प्रशांत संबरगी, ‘राष्ट्र-धर्म संघटने’चे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष केंचम्बा हे मान्यवर उपस्थित होते.


हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महायज्ञामध्ये प्रत्येक हिंदु कुटुंबातील सदस्यांनी आहुती द्यावी ! – आचार्य राजेश्वर, राष्ट्रीय अध्यक्ष, संयुक्त भारतीय धर्म संसद, राजस्थान

आचार्य राजेश्वर

पूर्व जगभर हिंदु संस्कृती होती. आता तेथे अन्य धर्मीय राज्य करत आहेत. काही वर्षांपूर्वी हिंदूंनी काश्मीरमधून पलायन केले. सध्या देशात ६०० ठिकाणी छोटे पाकिस्तान बनले आहेत. तेथूनही हिंदू हळूहळू पलायन करत आहेत. त्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असेल, तर सर्व हिंदूंनी जात आणि स्वार्थ यांच्या पलीकडे जाऊन संघटित झाले पाहिजे. देशभरात अनेक जातीयवादी नेते आहेत. त्यांचे जातीआधारित राजकारण चालू आहे. त्यामुळे ते हिंदूंना संघटित होऊ देत नाहीत. त्यामुळे हिंदू धर्माच्या आधारावर एकत्र येत नाहीत. देशातील सर्व संत समाजाने हिंदु राष्ट्राची स्थापना करायचे ठरवले, तर त्यांना थांबवण्याचे सामर्थ्य कोणातच नाही. त्यामुळे संतांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित व्हावे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महायज्ञामध्ये प्रत्येक हिंदु कुटुंबातील सदस्यांनी आहुती दिली, तर हा देश निश्चित हिंदु राष्ट्र बनेल.