हिंदूंच्या धर्मांतराला ‘बॉलीवूड’ उत्तरदायी ! – मध्यप्रदेशातील आय.ए.एस्. अधिकारी नियाझ खान

मुसलमानांना गोरक्षक बनण्याचा आणि हिंदूंचे धर्मांतर न करण्याचा दिला सल्ला !

आय.ए.एस्. अधिकारी नियाझ खान

भोपाळ (मध्यप्रदेश) – भारतात धर्मांतराचा आरंभ हा बॉलीवूडमुळे झाला आहे. हे संपूर्ण पाप बॉलीवूडमुळेच पसरले आहे. गेल्या ७० वर्षांत मोठमोठ्या अभिनेत्यांनी विवाह केला आणि त्यानंतर त्यांच्या पत्नींना इस्लाम स्वीकारायला लावला. त्यामुळे नवी पिढीही बॉलीवूडचेच अनुकरण करत आहे, असे वक्तव्य मध्यप्रदेशातील आय.ए.एस्. अधिकारी नियाझ खान यांनी केले. त्यांनी मुसलमानांना गोरक्षक बनण्यासमवेत हिंदूंचे धर्मांतर न करण्याचा सल्लाही दिला आहे. इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतरावर बंदी आहे. मुसलमानांनी मांसाहार करू नये, असेही खान म्हणाले.

खान यांनी एका हिंदी वर्तमानपत्राशी बोलतांना पुढे म्हटले की,

१. हिंदू गायीला आई मानतात. त्यामुळे गायीचा संपूर्ण सन्मान व्हायला हवा. पूर्वोत्तर भारतात गोमांस मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. जर तेथील लोक जागरूक झाले, तर ते गोहत्येची सूचना सरकारला देऊ शकतील. याने गोमातेचे रक्षण आधीच करता येऊ शकेल.

२. भारताच्या स्वातंत्र्यानंतर केवळ एका पक्षाचेच (हिंदूंचेच) बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. धर्मांतराच्या एकूण घटनांपैकी ९० टक्के प्रकरणांत हिंदूंचेच धर्मांतर करण्यात आले.

३. हिंदु धर्म हा सनातन धर्म आहे. भारताने कधीच कोणत्या देशावर आक्रमण केले नाही. आजपर्यंत हिंदूंनी कुणाचीच भूमी हडपली नाही. त्यांच्याइतके सहिष्णु कुणीच नाहीत. जर कुणी असा विचार करत असेल की, त्यांचा समुदाय हिंदूंपेक्षा चांगला आहे, तर ही विचारसरणी चुकीची आहे.

ओवैसी यांची मानसिकता ‘जिहादी’ ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

नियाझ खान यांच्या वक्तव्यांवरून मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी खान यांच्याकडून एम्.आय.एम्. चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी शिकावे, असे वक्तव्य केले आहे. नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले की, मध्यप्रदेशात धर्मांतराच्या दुष्टचक्राला चालू दिले जाणार नाही.

 (सौजन्य : Zee Madhya Pradesh Chhattisgarh)

ओवैसी यांनी लव्ह जिहादला बळी पडलेल्या देहली येथील साक्षी हिच्याविषयी कोणतेच वक्तव्य केले नाही. दमोहमधील घटनेवरून मात्र त्यांनी तक्रार केली आहे. ओवैसी यांच्या या मानसिकतेला जिहादी मानसिकता म्हटले जाते.

राज्यातील दमोह येथील एका शाळेतील मुलींना हिजाबसारखे वस्त्र घालण्याच्या नियमामुळे, तसेच तेथील अन्य अयोग्य गोष्टींमुळे मध्यप्रदेश शासनाने ती शाळा नुकतीच बंद करण्याचा आदेश दिला आहे.