१ सहस्र ४४५ कोटी रुपयांच्या ‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या’चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ !

मंदिर जतन, वारसा संवर्धन आणि भाविकांसाठी आधुनिक सुविधा

‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या’चा शुभारंभ करतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अन्य मान्यवर

कोल्हापूर – केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत २० जून या दिवशी ‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या’च्या अंतर्गत १ सहस्र ४४५ कोटी रुपयांच्या मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांच्या कोनशीलेचे अनावरण करून शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम, भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधीवत् पूजा केली. त्यानंतर मंदिर परिसरातील रामाचा पार येथे ‘श्रीं’च्या उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले. राज्यशासनाने संमत केलेला ‘महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा’ हा कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीला अधिक बळकटी देणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरत आहे.

‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या’च्या शुभारंभप्रसंगी कोनशीलेचे अनावरण करतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अन्य मान्यवर

३ टप्प्यांत राबवण्यात येणार्‍या या ‘बृहद् विकास आराखड्या’च्या अंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर आणि देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय, दुकाने, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, भव्य सभागृह, पोलीस ठाणे, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या प्रमाणावर वाहनतळ उभारण्यात येणार आहेत.
सध्या मूळ मंदिराच्या संवर्धनासाठी ३२ कोटी ९६ लाख रुपये, तसेच मंदिरातील विद्युतीकरण, सी.सी.टी.व्ही. आणि विद्युतीकरण विषयक कामांसाठी २३ कोटी ५ लाख रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत.

मंदिराचे पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या ४१ लहान-मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामेही हाती घेण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी २८ सहस्र ५८ चौरस मीटर भूमीचे मूल्यांकन करण्यात आले असून त्यापैकी १९ सहस्र ४८९ चौरस मीटर खासगी क्षेत्राच्या भूसंपादनाची प्रक्रिया अपर मुख्य सचिव (नगर विकास) यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मार्गदर्शनाखाली वेगाने चालू आहे.