भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर ‘हिंदु राष्‍ट्रा’शिवाय पर्याय नाही ! – नीलेश टवलारे, हिंदु जनजागृती समिती, अमरावती

१६ ते २२ जून या कालावधीत गोवा येथे ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ !


अमरावती, ९ जून (वार्ता.) – देशात जिहादी आतंकवाद्यांना मोठ्या प्रमाणात अटक होत आहे. पंजाबमध्‍ये खलिस्‍तानवादी पोलीस-प्रशासनाला आव्‍हान देत आहेत, हिंदु कार्यकर्त्‍यांच्‍या हत्‍या करत आहेत; तर मणिपूर, नागालँड यांसारख्‍या राज्‍यांतील हिंदूंची घरे जळत आहेत. काश्‍मीरमधून कलम ३७० हटवले गेले, तरी तेथील हिंदू सुरक्षित झालेले नाहीत. लव्‍ह जिहाद ‘दी केरला स्‍टोरी’ या चित्रपटाने मांडलेले वास्‍तव केवळ ‘केरळ’ राज्‍यापुरते मर्यादित नसून या जिहादी षड्‌यंत्राची व्‍याप्‍ती देशभरात मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे. पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘आय.एस्.आय.एस्.’ हे भारताला वर्ष २०४७ पर्यंत इस्‍लामी राष्‍ट्र बनवण्‍याचे षड्‌यंत्र रचत असल्‍याचे उघड झाले आहे.

डावीकडून श्री. विनीत पाखोडे, सौ. वृंदा मुक्‍तेवार, श्री. नीलेश टवलारे, श्री. प्रकाश सिरवाणी, श्री. गिरिधर चव्‍हाण, श्री. अनुप जयस्‍वाल

यामुळे हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्याला गती देण्‍यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ आयोजित करण्‍यात आला आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्‍या पत्रकार परिषदेस देवस्‍थान सेवा समितीचे सचिव श्री. अनुप जयस्‍वाल, जगदगुरु रामराजेश्‍वर माऊली यांचे प्रतिनिधी श्री. गिरीधर चव्‍हाण, श्री. पिंगळादेवी संस्‍थानचे अध्‍यक्ष श्री. विनीत पाखोडे, जीव आनंद सेवा समितीचे संस्‍थापक अध्‍यक्ष श्री. प्रकाश सिरवानी, समाजसेविका सौ. वृंदा मुक्‍तेवार हे मान्‍यवर उपस्‍थित होते. यांनीही या अधिवेशनाला जाहीर समर्थन घोषित केले आणि या अधिवेशनाला प्रत्‍यक्ष उपस्‍थित रहाणार असल्‍याचे सांगितले.