शासकीय विभागीय ग्रंथालयाची वास्तू सांस्कृतिक विकासाचे केंद्र व्हावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या समवेत पालकमंत्री उदय सामंत, कृषीमंत्री दादा भुसे आणि अन्य मान्यवर

रत्नागिरी – शासकीय विभागीय ग्रंथालयाची वास्तू ऐतिहासिक ठेवा आहे. ही वास्तू राज्याच्या सांस्कृतिक विकासाचे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

लोकमान्य बाळ गंगाधार टिळक यांच्या स्मरणार्थ कोकणवासियांकरता राज्य शासनाद्वारे २० ऑक्टोबर १९७६ या दिवशी चालू करण्यात आलेल्या या जुन्या शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या इमारतीचे आधुनिकीकरण करण्यात आले. या वास्तूचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २५ मे या दिवशी लोकार्पण करण्यात आले. या वेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री उदय सामंत, कृषीमंत्री दादा भुसे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले,

१. रत्नागिरी ही ऐतिहासिक वारसा असलेली भूमी आहे. या भूमीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अशी नररत्ने दिली आहेत. देशाच्या स्वातंत्र्यात या विरांचे योगदान मोठ्या प्रमाणावर आहे.

२. शासनाचे कोकणच्या विकासाकडे बारकाईने लक्ष असून कोकणच्या विकासाकरता शासन कटीबद्ध आहे.

३. साडेचार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या देखण्या वास्तूमध्ये सुमारे १ लाख १४ सहस्र इतकी ग्रंथसंपदा असून याचा ५० हून अधिक संशोधक अभ्यासक लाभ घेत आहेत.

४. लोकमान्य टिळक स्मृतीशताब्दी निमित्ताने पालकमंत्री उदय सामंत यांनी या वास्तूसाठी उच्च तंत्र शिक्षण विभागाकडून अनुमाने ५ कोटी उपलब्ध करून दिले.

५. या ग्रंथालयामुळे शहरवासियांची वाचन संस्कृती जोपासण्यास साहाय्य होईल, तसेच विपुल ग्रंथ संपदेमुळे याचा संदर्भ ग्रंथालय म्हणूनही उपयोग होईल.