त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीवर धूप दाखवणे परंपरा कि हात-पाय पसरा ?

‘त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीवर धूप दाखवण्याची जुनी परंपरा असल्याचे सांगत काहींनी संदल (चादर आणि त्यावर हार घालून मुसलमानांनी काढलेली मिरवणूक) घेऊन मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यावरून उलटसुलट चर्चा चालू झाली आहे. राज्यातील शांतता आणि सुव्यवस्थेला नख लागेल, अशी कृत्ये बघायला मिळणे वा जाणीवपूर्वक कुणी तसा प्रयत्न करणे निषेधार्हच आहे. त्यामुळे अलीकडे अकोला, त्र्यंबकेश्वर, शेवगाव आदी ठिकाणच्या घटना काळजी वाढवणार्‍या असून ही कृत्ये करणार्‍यांचा नेमका मानस जाणून घेणे आवश्यक आहे.

डॉ. सच्चिदानंद शेवडे, लेखक-व्याख्याते

१. मशिदीत जाऊन हनुमान चालिसाचे पठण करण्याची अनुमती मिळेल का ?

सगळी एका देवाची लेकरे असल्यामुळे ‘परधर्मीय आपल्या मंदिरांमध्ये आले तर काय बिघडते ?’, असा काहींचा खास पुरोगामी सूर असतो; पण गंमत अशी की, हीच गोष्ट कुणी मशिदीविषयी बोलतांना दिसत नाही. समजा उद्या कुणा अन्य धर्मियाने मशिदीत जाऊन हनुमान चालिसाचे पठण करायचे म्हटले वा आपल्या देवतेची मूर्ती नेऊन तिथे पूजन करायचे ठरवले, तर सगळी एकाच देवाची लेकरे असल्याने त्यास मान्यता दिली जाईल का ? हा खरा प्रश्न आहे.

२. मंदिरात अन्य धर्मियांना प्रवेश न देण्यामागील एक कारण

एकदा एका वृत्तवाहिनीवरील सोमनाथाच्या मंदिरात ‘अहिंदूंना प्रवेश नाही’, अशी पाटी लावण्यात आल्याविषयी आयोजित चर्चासत्रात मला बोलावले होते. तेव्हा मी याचे समर्थन करत सांगितले होते की, आम्ही त्यांच्या धर्माच्या काळजीपोटीच हे करतो; कारण इस्लाम हा बुतपरस्ती, म्हणजे मूर्तीपूजेच्या विरोधात आहे. अशा वेळी एखाद्या मुसलमान बांधवाने सोमनाथाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि नंतर त्याच्याच धर्मियांनी त्याच्या विरोधात फतवा काढला अन् धर्म-जातीतून बहिष्कृत केले, तर त्या व्यक्तीला मोठा त्रास सहन करावा लागणार नाही का ? हे टाळण्यासाठी मंदिरात अन्य धर्मियांना प्रवेश नसतो. या संदर्भावरून लक्षात येते की, हा अलीकडचा विषय नसून या आधीही असे प्रयत्न वा चर्चा झालेल्या आहेत.

३. विनोबा भावे यांना दर्ग्यामध्ये महिलांना वगळून पुरुषांसह दिलेला प्रवेश आणि त्यावर सावरकर यांनी केलेले रोखठोक प्रतिपादन

वर्ष १९५८ मध्ये पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात विनोबांसह काही मुसलमान आणि ख्रिस्ती यांना तेथील काही बडव्यांकडून प्रवेश दिला गेला होता. तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये यावर एक छोटी बातमी आली होती; पण त्यावर कुणाचाही निषेधाचा सूर उमटला नाही. केवळ ल.ग. थत्ते या तत्कालीन ‘हिंदु राज्य पक्षा’च्या नेत्यानेच त्याविषयी निषेध नोंदवला; पण पुढचा परिणाम असा की, त्यानंतर एक-दोन आठवड्यांतच कोल्हापूरमधील कित्येक मशिदींवर ‘केवळ नमाजींनाच प्रवेश’ असे फलक फडकले होते. त्यानंतर वाटेतील एका दर्ग्यात जातांना विनोबांच्या समवेत असणार्‍या घोळक्यातील स्त्रियांना मात्र दर्ग्यात प्रवेश नाकारला गेल्याची घटना घडली. त्यानुसार विनोबाजी केवळ पुरुष सहकार्‍यांसह आत गेले आणि पावन होऊन परत आले. तेव्हा त्यांनी स्त्रियांना प्रवेश नाकारण्याचे कारण विचारले नाही.

यावर तत्कालीन, म्हणजे १९५८ च्या ‘दैनिक नवाकाळ’च्या दिवाळी अंकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा एक लेख आला होता. त्यामध्ये विनोबांना सूचना करतांना ते म्हणाले होते, ‘पाकिस्तानात एक पदयात्रा काढून आयुब खान आणि सिकंदर मिर्झा यांचे हृदय परिवर्तन करून विभागणीच्या काळात उद्ध्वस्त केलेल्या महत्त्वाच्या हिंदु देवालयांचा तिथे पुनरुद्धार करवला गेला अन् हिंदूंना निर्विघ्नपणे पुन्हा मूर्तीपूजा आदी कार्ये करता येऊ लागली, तर त्याची अनुकूल प्रतिक्रिया हिंदुस्थानातही दिसेल. येथील अनेक मशिदींमध्ये हिंदु बांधवांसाठी राखून ठेवलेल्या एका तरी विभागात त्यांना देवमूर्तीची पूजा करता येऊ लागली आणि हिंदुस्थानातील हिंदु देवळांमध्ये प्रवेश करून मुसलमान नमाज पढू लागले किंवा ख्रिस्ती त्यांच्या पद्धतीने अर्चना करू लागले, तर मानवधर्माचा किती मोठा विजय होईल…! मग आम्हीही ‘जय जगत’ अशी घोषणा करत विनोबाजींचे अभिनंदन करू शकू.’ या लेखाच्या अखेरीस मात्र सावरकर म्हणतात, ‘खरोखरच कुणी तरी अशा मानव धर्माची सर्वांसाठीची निराळी आणि स्वतंत्र पूजास्थाने स्थापन करणे, ही एक तोड होऊ शकते, ज्याला आमचा अजिबातच विरोध रहाणार नाही…’

याच लेखात त्यांनी एक उदाहरण दिले. रत्नागिरीला काँग्रेसचे मोठे नेते युसूफ मेहरअली आले होते. ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांना म्हणाले होते, ‘‘हे पतित पावन मंदिर तुम्ही सगळ्या जातींसाठी खुले ठेवले आहे, तसे सगळ्या धर्मांकरताही खुले असायला हवे होते, म्हणजे ते अखिल भारतीय देवालय होऊ शकले असते.’’ त्या वेळी सावरकर म्हणाले होते, ‘‘जगामध्ये सगळीकडे हाच प्रघात आहे. श्रद्धा असते त्याच धर्मातील लोकांना त्या त्या प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश असतो. त्यामुळेच इथे पाटी अशी लिहिली आहे की, ‘व्यवस्थापकांच्या विशेष अनुज्ञेवाचून अहिंदूंना या मंदिरात प्रवेशाचा अधिकार नाही.’’

४. मूर्तीपूजा होणार्‍या ठिकाणी अन्य धर्मियांच्या जाण्याचा अट्टहास शंकास्पद !

अलीकडेच केशवदेवाच्या मूर्तीसंदर्भात न्यायालयाचा आदेश आला. ‘मआसिर-ई-आलमगिरी’मध्ये केशवदेवाची मूर्ती ही बेगम मशिदीच्या पायर्‍याखाली गाडली गेली असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. हा इतिहासातील उल्लेख असल्यामुळे सर्वांत मोठा पुरावाही आहे. असे असतांना मूर्तींची अशी अवस्था होत असेल, तर मूर्तीपूजा होणार्‍या ठिकाणी अन्य धर्मियांच्या जाण्याचा अट्टहास, हा आपोआप शंकास्पद ठरतो !  दुसरीकडे मात्र सुन्नी, शिया, अहमदी आदी अनेक जण एकाच पंथाची लेकरे असली, तरी परस्परांच्या प्रार्थनास्थळी जाऊ शकत नाहीत !

थोडक्यात परस्परांची धार्मिक स्थाने, भावना आणि श्रद्धा यांचा आदर ठेवणे, हे सर्वांचेच कर्तव्य आहे.

५. हिंदूंच्या प्रार्थनास्थळांमध्ये जाण्याचा मुसलमानांचा अट्टहास का ?

इथे लक्षात घ्यायला हवे की, त्र्यंबकेश्वरमधील हा केवळ एकमेव विवाद नाही. पूर्वी केदारनाथमध्येही हे प्रकार झाले होते. बद्रिनारायणाच्या देवालयाच्या संदर्भातही हे घडले होते. या ठिकाणी कुणी काही घेऊन गेले नसले, तरी ही दोन्ही स्थाने आमची असल्याचा दावा काही मुसलमानांनी केला होता. ‘वो बदरीबाबा हैं’, असे ते म्हणू लागले होते. याच उत्तराखंडमध्ये मी अगदी महाविद्यालयीन दिवसांपासून जात आहे. तेव्हा तिथे आम्हाला औषधालाही मुसलमान दिसत नव्हते; पण आज तिथे प्रत्येक शुक्रवारी रस्ते अडवून नमाजपठण केले जाते. अलीकडेच उत्तराखंड सरकारने अनधिकृत असलेल्या १५ कबरी वा मजारी उखडून काढल्या, तेव्हा त्याखाली एकही प्रेत आढळले नव्हते; म्हणूनच  अशी काही घटना बघायला मिळते, तेव्हा सगळीकडेच शंका येऊ लागते. त्यामुळे आधीपासून सावधपणा राखणे योग्य ठरते. आपल्याला मूर्तीपूजा मान्य नसेल, तसेच एखाद्या धर्मातील श्रद्धा मान्य नसतील, तर अशा धर्माच्या प्रार्थनास्थळांमध्ये जाण्याचा अट्टहास का ? याचे उत्तर मिळणे आवश्यक आहे.

६. त्र्यंबकेश्वराला धूप दाखवण्याची कथित परंपरा संशयास्पद

आजपर्यंत त्र्यंबकेश्वराच्या पहिल्या पायरीवर धूप दाखवण्याची परंपरा पाळली जात असल्याचे स्थानिकांनाही ठाऊक नाही ! दुसरे म्हणजे तुम्हाला नुसता धूप दाखवायचा असेल, तर संदल (चादर आणि त्यावर हार) घेऊन जाण्याचे कारण काय ? याचेही स्पष्टीकरण मिळायला हवे. धूपच दाखवायचा, तर तो केवळ धूपदाणीनेही दाखवता येतो. खेरीज हे सगळे घडत असतांना प्रसारित (व्हायरल) झालेला व्हिडिओ बघता हा सगळा पुष्कळ चांगल्या पद्धतीने चालणारा प्रकार वा चांगले वातावरण असल्याचेही अजिबात दिसत नाही. त्यामुळेच या सगळ्यावरून या पवित्रस्थळी येणार्‍यांचे हेतू चांगले नव्हते, असे समजण्यास वाव रहातो.

७. कठोर पावले उचलून प्रकरणाचा छडा का लावला जात नाही ?

या पार्श्वभूमीवर अकोला, शेवगाव यांसारख्या ठिकाणी पेटलेली दंगल, हेही विचारात घेण्याजोगे सूत्र आहे. ‘तेथील दंगल कुणामुळे पेटली ? पेटवणारे कोण होते ? त्यांचा उद्देश काय होता ? यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. यामागे केवळ महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करण्याचा उद्देश आहे कि येऊ घातलेल्या निवडणुकांना अपशकुन करण्याचा हा प्रयत्न आहे ?’, या सगळ्याचा शोध लागणे आवश्यक आहे; कारण यात हिंदु असो वा मुसलमान, भरडला जाणारा नागरिक हा सर्वसामान्यच असतो. दंगलींमध्ये सर्वसामान्य माणूसच मरतो. यात दंगलखोरांचे काहीच बिघडत नसते.

८. यावरून होणारे राजकारण थांबणे आवश्यक !

देशात सर्वत्र भयाचे वातावरण निर्माण करण्याचे असे प्रयत्न हाणून पाडणे आवश्यक आहे; कारण अशी सूत्रे निवडणुकांसाठी वापरणे योग्य नव्हे. अलीकडेच पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या आधी प्रचारधुरळा काळात पुण्येश्वराजवळच्या दर्ग्याविषयीही ४-५ दिवस प्रचंड आरडाओरडा ऐकू आला; पण निवडणूक संपताच पुन्हा एकदाही तो आवाज ऐकू आला नाही. अचानक तो कुठे लुप्त झाला ? हे समजलेही नाही. थोडक्यात कोणताही पक्ष या विषयाचा राजकारणासाठी उपयोग करण्याची मानसिकता ठेवतो. ही स्थिती आता तरी थांबायला हवी !’

– डॉ. सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.  (२१.५.२०२३)

(साभार : फेसबुक आणि ‘नागपूर तरुण भारत’)