बजरंग दलावर बंदीची मागणी करणार्‍या काँग्रेसच्या विरोधात १०० कोटी १० लाख रुपयांचा मानहानीचा दावा ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विहिंप

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘बजरंग दलावर बंदीच्या मागणीच्या आड ‘पी.एफ्.आय.’ला वाचवण्याचे काँग्रेसी षड्यंत्र ?’

मुंबई – प्रतिबंधित ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) ची तुलना ‘बजरंग दला’शी करून तिच्यावर कर्नाटक काँग्रेसने बंदीची मागणी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात केली आहे. बजरंग दलाची अपकीर्ती केली; म्हणून बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषदेचा चंडीगड प्रभाग यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात १०० कोटी १० लाख रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. याविषयीची कायदेशीर नोटीस काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवली आहे, अशी माहिती ‘विश्व हिंदु परिषदे’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. विनोद बंसल यांनी दिली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘बजरंग दलावर बंदीच्या मागणीच्या आड ‘पी.एफ्.आय.’ला वाचवायचे काँग्रेसी षड्यंत्र ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

भारताची जनता आणि बजरंगबलीचे भक्त काँग्रेसला धडा शिकवल्याविना रहाणार नाहीत ! – विनोद बंसल

श्री. विनोद बंसल

आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी हिंदूंना कलंकित करण्याचा प्रयत्न काँग्रेस सातत्याने करत आली आहे. बजरंग दलाचे राष्ट्रकार्य अविरतपणे चालूच आहे. कोरोना महामारीच्या काळात, तसेच विविध नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बजरंग दलाने सेवा कार्य केले आहे. बजरंग दलावर दोषारोप करून जिहादी संघटना पी.एफ्.आय.ला वाचवायचा प्रयत्न जर काँग्रेस करत असेल, तर ते कधीच यशस्वी होणार नाही. जनता आणि बजरंगबलीचे (हनुमानाचे) भक्त काँग्रेसला धडा शिकवल्याविना रहाणार नाहीत.

मुसलमानांच्या मतपेटीसाठी काँग्रेसचे राजकारण !  – अधिवक्त्या शुभा नाईक, कर्नाटक उच्च न्यायालय

कर्नाटक काँग्रेसने बजरंग दलावर बंदीची मागणी केली असली, तरी कुठल्याही राज्य सरकारला विशिष्ट संघटनेवर बंदी घालण्याचा कायदेशीरदृष्ट्या अधिकार नसतो. ‘पी.एफ्.आय.’वरही आम्ही बंदी आणू’, असे कर्नाटक काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. पी.एफ्.आय.वर केंद्र सरकारने आधीच बंदी आणली असतांना कर्नाटक काँग्रेस त्यांच्यावर वेगळी कुठली बंदी आणणार ? काँग्रेस मुसलमानांच्या मतपेटीच्या राजकारणासाठी हे सर्व करत आहे.

हिंदु संघटनांना कलंकित करणे, हा काँग्रेसचा इतिहास ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. नरेंद्र सुर्वे

खरे तर बजरंग दल आणि पी.एफ्.आय. यांची तुलनाच होऊ शकत नाही; कारण बजरंग दल ही राष्ट्रभक्त संघटना, तर पी.एफ्.आय. एक राष्ट्रविरोधी अन् आतंकवादी संघटना आहे. पी.एफ्.आय.ने वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र रचले होते. ते अन्वेषण यंत्रणांनी वेळीच उघडकीस आणले होते. त्यामुळे त्यांच्यावर केंद्रशासनाने बंदी घातली आहे. हिंदु संघटनांना कलंकित करणे, हा काँग्रेसचा इतिहास राहिला आहे. फक्त बजरंग दलच नव्हे, तर यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी अनेक हिंदु संघटनांवर काँग्रेसने बंदी आणण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र जिहादी संघटनांवर बंदी आणावी वा त्यांची पाळेमुळे खोदण्यासाठी तिने काहीच केले नाही. हिंदु समाज आता जागृत होत असून सर्व हिंदु संघटनांसह उभा रहाणार आहे.

मुसलमानांच्या तुष्टीकरणासाठी बजरंग दलावर बंदी घालू पहाणार्‍या काँग्रेसचे देशद्रोही स्वरूप जाणा !