क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या जिहादी कट्टरतेवर बनणार ‘टिपू’ चित्रपट !

मुंबई – कर्नाटकच्या म्हैसुरू येथील क्रूरकर्मा टिपू सुल्तानला त्याच्या कथित शौर्य, युद्धकौशल्य आणि राजकीय रणनीती पाहून ‘सुल्तान’ ही उपाधी देण्यात आली होती. टिपू हा महान स्वातंत्र्यसैनिक असल्याचे पाठ्यपुस्तकांतून खोटे सांगितले गेले असून त्याचे काळेकुट्ट वास्तव समाजासमोर येणे आवश्यक असल्याचे मत ‘टिपू (द स्टोरी ऑफ अ फॅनॅटिक सुल्तान’) (टिपू : एका धर्मांध सुल्तानाची गोष्ट) या आगामी चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह यांनी व्यक्त केले. ४ मे या दिवशी त्यांनी ट्वीट करून या चित्रपटाची घोषणा केली. सिंह सध्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ नावाचा चित्रपटही बनवत आहेत.

१. संदीप सिंह म्हणाले, ‘टीपू सुल्तान किती कट्टर आणि जिहादी होता, ही गोष्ट लोकांना ठाऊक नाही. इतिहासाची पुस्तके त्याच्या कामगिरींनी भरली आहेत; परंतु या आगामी चित्रपटाचे लेखक रजत सेठी यांनी जेव्हा चित्रपटाची गोष्ट लिहिली, ती वाचून माझ्या अंगावर शहारे आले. या चित्रपटाच्या माध्यमातून येणार्‍या पिढीसमोर त्याचा काळा इतिहास समोर येणे आवश्यक आहे.’

२. या चित्रपटाचा दिनांक, यातील कलाकार आदींची माहिती अजून समोर आलेली नाही. हा चित्रपट हिंदीसह कन्नड, तामिळ, तेलुगू आणि मल्ल्याळम् या भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

टिपू त्या काळचा हिटलर ! – चित्रपटाचे दिग्दर्शक पवन शर्मा

चित्रपटाचे दिग्दर्शक पवन शर्मा म्हणाले की, एक कट्टर मसलमान राजाच्या रूपातील त्याची वास्तविकता समजल्यावर मला धक्का बसला. मी निराश झालो. इतिहासाची छेडछाड करण्यात आली आहे. खरेतर टिपूने अनेक लोकांचे इस्लाममध्ये धर्मांतर केले, तसेच मंदिरे आणि चर्च यांना नष्ट केले. तो त्या काळातील हिटलर होता !’

तो एक अत्याचारी राक्षस होता ! – चित्रपटाचे लेखक रजत सेठी

चित्रपटाचे लेखक रजत सेठी म्हणाले,  ‘न केवळ इतिहासाची पुस्तके; परंतु लोकप्रिय संस्कृती, चित्रपट, नाटके आदींच्या माध्यमातून अत्यंत कुशलतेने टीपूचे सत्य बाजू दाखवणारे आणि संतुलित चित्रण करण्यात आलेले नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून यामध्ये सुधारणा करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. तो एक अत्याचारी राक्षस होता. त्यामुळे मी जगासमोर त्याने केलेली काळी कृत्ये ठेवू इच्छितो. प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर  ‘सुल्तान’ म्हणण्याच्या तो पात्रतेचाही नाही !’

टिपूचे भयावह वास्तव सांगणारा व्हिडिओ प्रसारित !

निर्माते संदीप सिंह यांनी ट्वीटसमवेत ५० सेकंदाचा चित्रपटाची माहिती देणारा एक व्हिडिओही प्रसारित केला आहे. त्यामध्ये ‘८ सहस्र मंदिरे आणि २७ चर्च नष्ट करण्यात आली. ४० लाख हिंदूंचे इस्लाममध्ये बळजोरीने धर्मांतर करण्यात आले आणि त्यांच्या तोंडात गोमांस कोंबण्यात आले. एक लाखाहून अधिक हिंदूंना कारागृहात धाडण्यात आले. कालिकत येथील २ सहस्र ब्राह्मण कुटुंबांची हत्या करण्यात आली. ‘जिहाद’ ही युद्धघोषणा असलेल्या टिपूच्या युद्धाला वर्ष १७८३ मध्ये आरंभ करण्यात आला’, ही माहिती देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • टिपू सुल्तानचा काळा इतिहास जगासमोर येणार, या विचारानेच नसरुद्दीन शाह, जावेद अख्तर आदींना पोटशूळ उठल्यास नवल वाटू नये !
  • ‘द केरल स्टोरी’च्या प्रदर्शनावर आक्षेप घेणारी काँग्रेस आता या चित्रपटाच्या चित्रीकरणावरच बंदी लादण्यासाठी प्रयत्न करू लागली, तर आश्‍चर्य वाटायला नको !