श्रीराम आणि श्रीकृष्ण समजून घेतल्यास समर्थ भारत घडेल ! – शरद पोंक्षे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ अभिनेते 

मडकई (गोवा) येथील सरकारी केंद्र शाळेच्या शतक महोत्सवाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद   

अभिनेते शरद पोंक्षे

मडकई – हिंदु संस्कृतीचे दोन प्रमुख खांब आहेत. एका खांबाचे नाव आहे प्रभु श्रीराम आणि दुसर्‍या खांबाचे नाव आहे श्रीकृष्ण ! ज्यांच्या आईने ज्यांना हे दोन ‘श्री’ शिकवले, ते पुढे महापुरुष झाले. पराकोटीचा आदर्श कसा असावा ? हे श्रीराम शिकवतो आणि आपण शत्रूसमवेत आदर्श कधी बाजूला ठेवावा ? अन् शत्रूला त्याच्या भाषेत उत्तर कसे द्यायचे ? हे श्रीकृष्ण शिकवतो. जिथे यांचा संगम झाला, तिथे एक छत्रपती शिवाजी जन्माला आले. अशा या सर्वांत जुन्या संस्कृतीला ‘सनातन हिंदु संस्कृती’ असे म्हटले जाते. कालगणना मोजण्याच्या पूर्वीही जे अस्तित्वात होते, ते म्हणजे हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती ! श्रीराम आणि श्रीकृष्ण समजून घेतले की, आपल्याला समर्थ भारत घडवता येईल, असे उद्गार प्रखर हिंदुत्वनिष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी काढले. मडकई येथील सरकारी केंद्र शाळेच्या शतक महोत्सवाच्या निमित्ताने ‘भारत : काल, आज आणि उद्या’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

(सौजन्य : Chinmay Madhu Ghaisas) 

ते पुढे म्हणाले की,

१. एकदा भारताचा इतिहास म्हणजेच भूतकाळ कळला की, वर्तमानाकडे बघता येते आणि मग आपण भविष्याचा विचार करू शकतो. त्यामुळे उद्याचा भारत कसा बनवायचा ? उद्याचा हिंदु धर्म आणि प्रत्येक हिंदु कसा असायला हवा ? हे लक्षात येते. त्यामुळे इतिहास पुष्कळ महत्त्वाचा असतो.

२. जगातील सर्व देश महासत्ता होण्यासाठी धडपडतात; परंतु एकमेव भारत देश ‘विश्वगुरु’ होण्यासाठी धडपडत आहे. शस्त्रांच्या आधारावर महासत्ता बनता येऊ शकते; मात्र ‘विश्वगुरु’ होण्यासाठी संस्कार आणि सनातन संस्कृती लागते.

३. ‘निधर्मी’ असे या जगात काहीच नाही. निधर्मी हा शब्द मानवाने स्वत:च्या स्वार्थासाठी निर्माण केला. निसर्गाने निर्माण केलेली कोणतीही वस्तू निधर्मी नाही. जे अस्तित्वात नाही, तेच या देशाला चिकटले आणि भारत निधर्मी देश बनला. त्यामुळे स्वतंत्र भारताची गेल्या ७५ वर्षांमध्ये भयाण अवस्था झाली. हिंदूंनी खुळचट निधर्मीवादातून बाहेर पडले पाहिजे.

४. हिंदू पृथ्वीला वंदन करतात, मुसलमान किंवा ख्रिस्ती वंदन करायला सिद्ध नसतात. इस्लाम आणि ख्रिस्ती या धर्मसंस्था असल्याने त्यांना संस्थापक आहेत. या धर्मसंस्था त्यांचे सदस्यत्व वाढवतात. त्याचे परिणाम आपल्याला गेल्या ७५ वर्षांच्या स्वतंत्र भारतात दिसत आहेत.

५. भारत हा देश नाही, तर एक ‘राष्ट्र’ आहे. देशाला भौगोलिक सीमा असतात, राष्ट्राला संस्कृती असते. संस्कृतीला क्षेत्रफळ नसते, तर ती जगभर पसरते. संस्कार जगभर पसरतात, मग एखादी संस्कृती संपूर्ण जगाला मार्गदर्शन देणारी ठरते आणि संपूर्ण जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता जगात एकाच संस्कृतीमध्ये आहे, त्या संस्कृतीचे नाव आहे हिंदु संस्कृती अन् त्या धर्माचे नाव आहे हिंदु धर्म !