पिसोळी (जिल्हा पुणे) येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित !

कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर !

पुणे – पिसोळी (तालुका हवेली) हे गाव वर्ष २०२१ मध्ये पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट केले आहे. महापालिकेने गाव हद्दीत घेतल्यानंतर करवाढ केली. गावात अंदाजे ४० सोसायट्या आहेत. प्रत्येक सोसायटीला प्रतिदिन सरासरी १० टँकर पाणी लागते; मात्र सर्वच नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. कचरा उचलण्यासाठी पैसे मोजावे लागतात. मलवाहिनीची दुरुस्तीही केली जात नाही. गावातील गल्ल्यांमध्ये ठिकठिकाणी साचलेला कचरा स्वच्छ केला जात नाही. कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे लहान मुले आजारी पडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेकडे तक्रार केली, तरी कुणीही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे ‘आमची ग्रामपंचायत बरी होती’, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. यावर पाणीपुरवठ्यासंबंधी पालिकेच्या मुख्य खात्याकडे पाठपुरावा चालू असल्याचे कोंढवा – येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील साहाय्यक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी असलेली महापालिका आता तरी तिचा कारभार सुधारेल का ?