स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणार्‍यांनी स्वतःची पात्रता ओळखून घ्यावी ! – शिवाजीराव पाटील, माजी खासदार

मंचर (जिल्हा पुणे) येथील ‘सावरकर गौरव यात्रे’ची समारोप सभा

सभेत बोलताना शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

मंचर (जिल्हा पुणे) – स्वातंत्र्यलढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यावर टीका करणारे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना देशाविषयी प्रेम नाही. सावरकरांवर टीका करणार्‍यांनी आधी त्यांची पात्रता ओळखून घ्यावी, अशी टीका शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. ते मंचर (ता. आंबेगाव) येथे शिवसेना, भाजप महायुती यांच्या साहाय्याने ४ एप्रिल या दिवशी ‘सावरकर गौरव यात्रे’च्या सांगता सभेत बोलत होते.

सभेत बोलताना भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव वर्षा डहाळे

या वेळी भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश सचिव वर्षा डहाळे म्हणाल्या की, स्वातंत्र्याच्या अग्नीकुंडात आयुष्याच्या समिधा वाहिलेल्या क्रांतीसूर्य सावरकर यांची जीवनगाथा सांगण्यासाठी ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीरांच्या कार्य आणि निष्ठा यांवर प्रश्नचिन्ह घेणार्‍यांना या यात्रेतून सडेतोड उत्तर मिळेल.