मेहबूबा आणि ‘नाटक’बाजी !

काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची हिंदुविरोधी कृत्ये भारतासाठी काही नवीन नाहीत; पण या वेळी त्यांनी हिंदु धर्माविषयीच्या प्रेमाचा उघडउघड दिखावा केला आहे. त्यांनी पुंछ येथील नवग्रह मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करत पूजा केली. मंदिराचे बांधकाम करणार्‍या यशपाल शर्मा यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पित केले. ‘मेहबूबा यांचे हे नाटक आहे’, असे कुणीही सांगेल. आतापर्यंतचा त्यांचा इतिहास हिंदुद्वेषीच ठरला आहे. इतका हिंदुद्वेष नसानसांत भिनलेला असतांना हिंदु धर्मातील एखादी कृती करणे हे सहज शक्य होऊच शकत नाही. त्यांनी जलाभिषेक केला, म्हणजे त्या हिंदु धर्मप्रेमी निश्चितच नाहीत. त्यांचा हा नाटकीपणा लक्षात घेत इस्लामी संस्थांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. ‘एक दिवस जलाभिषेक केला म्हणजे हिंदूंचे मन जिंकले’, असे होऊ शकत नाही; कारण हिंदू हे मुफ्तींचा काळा इतिहास जाणून आहेत. ‘मंदिरांत गेलो म्हणजे हिंदूंचे (मत) पाठबळ मिळते’, असा भ्रम बाळगून मेहबूबा या हिंदूंच्या मनात (मतात) स्थान मिळवण्याचा विचार करत आहेत, हे उघड सत्य आहे.

मेहबूबा यांचा हिंदुद्वेषी इतिहास !

जी बाई जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय अस्थैर्य निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करते, ती हिंदूंच्या मंदिरात जाऊन दिखाऊपणाच्या हेतूने काहीही करू शकते, हे निश्चित ! मध्यंतरी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराघरांवर तिरंगा लावण्याविषयीचे अभियान राबवले होते; पण काश्मीर खोर्‍यावर हक्क गाजवू पहाणार्‍या मुफ्तीबाईंनी त्याला मुद्दामहून विरोध केला होता. ‘जोपर्यंत काश्मीरचा ध्वज आपल्या हातात येत नाही, तोपर्यंत तिरंगा हातात घेणार नाही’, असेही त्या म्हणाल्या होत्या. भारताच्या राष्ट्रध्वजाला विरोध करणारा देशद्रोहीच ठरतो. त्यामुळे अशांकडून होणार्‍या कृत्यांमागील कारणमीमांसा प्रत्येक वेळी पडताळूनच घ्यायला हवी. ‘भाजप देशातील धर्मनिरपेक्षतेवर ‘बुलडोझर’ चालवून देशात अनेक ‘छोटी पाकिस्ताने’ बनवत आहे’, असा कांगावाही त्यांनी मध्यंतरी केला होता. अर्थात् ही ‘छोटी पाकिस्ताने’ कोण निर्माण करत आहे ? हे भारतियांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे अशी वाचाळ बडबड करणार्‍यांना हिंदू स्थान देत नाहीत. मेहबूबा यांनी काही वर्षांपूर्वी ‘अमरनाथ श्राईन बोर्डा’ला भूमी देण्यास विरोध केला होता; कारण तेथे यात्रेकरूंसाठी तात्पुरते तंबू बांधण्यात येणार होते; मात्र मेहबूबा यांनी बोर्डाला तात्पुरत्या काळासाठी भूमी हस्तांतरित करण्यास नकार दिला होता, हेही हिंदू जाणून आहेत. नवग्रह मंदिरातील जलाभिषेक आणि ‘अमरनाथ श्राईन बोर्ड’ येथील भूमीला विरोध या दोन्ही घटना लक्षात घेता हिंदूंनी भूमीच्या हस्तांतरणास नकार देत दुटप्पी चेहरा दाखवणार्‍या मेहबूबा यांना खडसावले पाहिजे. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘काश्मिरमधील सैन्यासाठीच्या छावण्या आणि वायूदलासाठीच्या धावपट्ट्या यांचे नियंत्रण लष्कराने सोडावे’, अशी राष्ट्रद्रोही मागणी केली होती. यात राष्ट्रहिताचा विचार निश्चितच नसून एकेक भूमी बळकावण्याचे आणि हडप करण्याचेच ते कारस्थान होते, हे उघड आहे. भारताच्या विभाजनासाठी आटोकाट प्रयत्न करणार्‍या मेहबूबा यांचा हा नाटकीपणा जनतेसमोर यायला हवा. प्रत्येक वेळी पाकिस्तानला बळ देणारे डावपेच रचणार्‍या मेहबूबा यांचा धूर्तपणा याआधीही वेळोवेळी उघड झालेला आहे. त्यामुळे आताही अभिषेकाच्या ‘नाटका’मागे त्यांचा निवडणुकीत मते मिळवण्याचा नव्हे, तर हिसकावून घेण्याचा सुप्त हेतू जनतेसमोर यायला हवा.

दिखाव्याचे लक्ष्य मंदिरे !

हिंदूंच्या मंदिरात जाऊन दिखाऊपणा करणार्‍या मेहबूबा या काही पहिल्या व्यक्ती नाहीत. याआधी राहुल गांधींनीही असे प्रकार केले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदूंच्या मोठमोठ्या आणि भव्य मंदिरांत जाऊन देवाचे दर्शन घ्यायचे, जानवे घालायचे, प्रसाद घ्यायचा. हा खटाटोप हिंदु धर्मप्रेमासाठी नसतो, तर हिंदूंची मते मिळवण्यासाठी असतो. निवडणुका झाल्या की, मग हा दिखाऊपणा, नाटकबाजी सर्व काही बासनात गुंडाळून ‘ये रे माझ्या मागल्या !’ चालू होते. हिंदु धर्मप्रेमाचा पुळका जाऊन त्याची जागा हिंदुद्वेषाने घेतली जाते. या दिखाऊपणाला काही भाबडे हिंदू भुलतात आणि त्यांच्या आमिषाची शिकार होतात; पण आतातरी हिंदूंनी सतर्क रहावे. मेहबूबा यांचीही कृती काही वेगळी नाही. त्यांनी केलेला जलाभिषेक म्हणजे राहुल गांधी यांच्या दिखाऊपणाच्या पावलावर पाऊल ठेवण्याचाच प्रकार असे म्हणावे लागेल. हे आणखी किती काळ सहन करत रहायचे ? बरे, ही अशी नाटके केवळ हिंदूंच्याच संदर्भात केली जातात. अन्य धर्मियांना चुचकारण्यासाठी असे प्रयत्न करण्यात येत असल्याचे आढळत नाही. ‘हिंदूंच्या धर्मभावनांना हात घातल्यास ते आपल्या बाजूने वळतात’, हे अशांना चांगलेच ठाऊक असल्याने ते हिंदूंच्या या वृत्तीचा अपलाभ घेऊन राजकीय हित साधू पहातात. या धूर्तांना वेळीच ओळखावे. हिंदूंनीही भाबडेपणा सोडून शहाणे व्हावे, ही काळाची आवश्यकता आहे. विरोधकांना आणि मतांच्या लालसेपोटी हिंदूंच्या श्रद्धेचा आधार घेणार्‍यांना खरेतर मंदिराची पायरीही चढू देऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित व्हायला हवे. तसे न झाल्यास विरोधक प्रत्येक वेळी मंदिरांत प्रवेश करून स्वतःतील कपटी हेतूने तेथील पावित्र्य भंग करतील !

सेलांगॉरचे धार्मिक व्यवहार विभागाचे कार्यकारी अधिकारी झवावी अहमद मुघनी

मलेशियामध्ये चर्च किंवा मंदिरे यांमधील कार्यक्रमांना उपस्थित रहाण्यास मुसलमानांना बंदी आणण्यात आली आहे. भारताच्या तुलनेत पुष्कळ न्यून लोकसंख्या असणार्‍या मलेशियाला जे जमले, ते बहुसंख्य हिंदू असलेल्या बलाढ्य भारताला का जमू शकणार नाही ? निधर्मीपणाचा ढोल बडवल्या जाणार्‍या भारतात असे होऊ शकणारच नाही, हे जरी खरे असले, तरी प्रत्येक वेळी हिंदूंनीच धर्मनिरपेक्षतेचे पालन करण्याविषयी केला जाणारा अट्टहासही योग्य नाही. हिंदूंचे भव्य संघटनच नाटकबाजी करणार्‍यांच्या कृत्यांना आळा घालू शकेल, हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने कृतीशील व्हा !

हिंदुद्वेष्ट्या मेहबूबा मुफ्ती यांच्या दिखाऊपणावर ‘हिंदूंचे प्रभावी संघटन’ हेच प्रत्युत्तर ठरेल !