शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य आणि अधिक देखणा करण्यासाठी सूचना पाठवा !

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

मुंबई, ११ मार्च (वार्ता.) – पारतंत्र्याच्या अंध:कारातून स्वराज्याच्या प्रकाशाकडे महाराष्ट्र आणि देश यांना घेऊन जाणार्‍या ऐतिहासिक अन् तेजोमय शिवराज्याभिषेक सोहळ्याला वर्ष २०२४ मध्ये ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून शिवराज्याभिषेकाचा ३५० वा वर्धापनकाळ ‘शिवराज्याभिषेक महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. हा महोत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा, यादृष्टीने राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील मान्यवर यांनी कल्पक सूचना पाठवाव्यात, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १० मार्च या दिवशी येथे केले आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

या महोत्सवाच्या आयोजनाने महाराजांचे कृतज्ञ स्मरण करणे, त्यांच्या असाधारण कर्तृत्वाचा जागर करणे, त्यातून निर्माण होणार्‍या ऊर्जेतून सत्कार्याची वाट उजळणे यांसह नव्या पिढीपर्यंत महाराजांचा हा पराक्रमी वारसा पोचवावा आणि त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, या हेतूने शिवराज्याभिषेक महोत्सवाच्या अनुषंगाने या संपूर्ण वर्षामध्ये विविध प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. [email protected] या ई-मेलवर सूचना पाठवाव्यात, असेही आवाहन त्यांनी केले आहे.