औरंगजेबाचे फलक फडकवणार्‍यांवर कारवाई करणार ! – मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप

  • छत्रपती संभाजीनगर येथील ‘एम्.आय.एम्’च्‍या उपोषणातील प्रकार !

  • आक्षेपार्ह वक्‍तव्‍यांद्वारे औरंगजेबाचे उदात्तीकरण !

मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – छत्रपती संभाजीनगर येथे संभाजीनगरचे ‘औरंगाबाद’ नामांतर करण्‍याच्‍या मागणीसाठी एम्.आय.एम्. पक्षाच्‍या वतीने साखळी उपोषण चालू आहे. रात्री विलंबापर्यंत चालू असलेल्‍या उपोषणातील भाषणांत आक्षेपार्ह वक्‍तव्‍ये केली जात आहेत. औरंगजेबाचे छायाचित्र हातात घेऊन ‘औरंगजेब हा सर्वांचा बाप होता’, असे सांगून त्‍याचे उदात्तीकरण करण्‍यात येत आहे. त्‍यामुळे उपोषणकर्त्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ८ मार्च या दिवशी विधान परिषदेत औचित्‍याच्‍या सूत्रावरील चर्चेच्‍या वेळी केली.

या वेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोषींवर कारवाई करण्‍याचे आश्‍वासन दिले.

छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून ठार मारणारा आणि लक्षावधी हिंदूंची क्रूर हत्या अन् सहस्रों मंदिरांचा विध्वंस करणारा औरंगजेब इम्तियाज जलील यांना किती ‘प्रिय’ आहे, हे यावरून दिसून येते !

पोलीस दुर्लक्ष करत आहेत ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

अंबादास दानवे म्‍हणाले, ‘‘संभाजीनगर येथे ‘एम्.आय.एम्’ पक्षाच्‍या वतीने साखळी उपोषण चालू असतांना तेथे बिर्याणी खाल्ली जाते, तसेच रात्री १० वाजेपर्यंत ध्‍वनीक्षेपक लावण्‍याची अनुमती असतांना रात्री १२ वाजेपर्यंत ध्‍वनीक्षेपकांद्वारे भाषण चालू असते. या उपोषणात औरंगजेबाचे फलक हातात धरून ‘औरंगजेब हा कोण होता, तर तो सर्वांचा बाप होता’, असे आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केले जात आहे. इतरांचे उपोेषण चालू असतांना ते तत्‍परतेने बंद पाडणारे पोलीस या उपोषणातील उचापतींकडे दुर्लक्ष करत आहेत. पोलिसांनी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य करणार्‍यांवर कारवाई करावी.’’

 (सौजन्य : TV9 Marathi) 

मंत्री चंद्रकांत पाटील म्‍हणाले की, ‘एम्.आय.एम्.’च्‍या उपोषणात करण्‍यात आलेल्‍या आक्षेपार्ह वक्‍तव्‍याची नोंद घेतली जाईल. या उपोषणात असेच वक्‍तव्‍य चालू राहिले, तर ते देशद्रोह्यापर्यंत जाऊ शकतील. रात्री १० वाजल्‍यानंतर ध्‍वनीक्षेपक लावण्‍याची अनुमती वाढवून दिली जात नाही. या सर्व गोष्‍टी लक्षात घेऊन गृहमंत्र्यांना दोषींवर कारवाई करण्‍याविषयी सांगितले जाईल.

अशा प्रवृत्तींवर कायदेशीर कारवाई करा ! – उपसभापतींचे निर्देश

यावर उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे म्‍हणाल्‍या, ‘‘उपोषणात औरंगजेबाचे फलक लावण्‍याचे कारस्‍थान हे समाजकंटकांचे होते, हे आता आक्षेपार्ह विधानांवरून स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यामुळे आक्षेपार्ह घोषणा देणारे ‘एम्.आय.एम्.’चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्‍यावर महाराष्‍ट्र झोपडपट्टी कायद्यान्‍वये कारवाई करावी, असे निर्देश मी देत आहे. लोकांच्‍या संयमाचा अंत पाहू नये. हे प्रकरण गांभीर्याने घेण्‍याची आवश्‍यकता आहे. या घटनेमागचे धागेदोरे शोधून त्‍यांच्‍यावरही कारवाई करावी.’’

संपादकीय भूमिका 

औरंगजेबाचे उघडपणे होत असलेले उदात्तीकरण न दिसणारे पोलीस आंधळे आणि बहिरे आहेत का ? अशा कर्तव्‍यचुकार पोलिसांवरही तात्‍काळ कठोर कारवाई केली पाहिजे !