कणेरी मठातील गायींचा मृत्यू; कारण अस्पष्ट

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – पंचमहाभूत लोकोत्सव चालू असतांना कणेरी मठातील काही गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नेमका किती गायींचा मृत्यू झाला हे, तसेच गायींच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कणेरी मठात काही गायींचा झालेला मृत्यू ही घटना दुर्दैवी ! – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी

कोल्हापूर – कणेरी मठात काही गायींचा मृत्यू झाला, ही घटना दुर्दैवी अपघात आहे. कुणीतरी अज्ञानापोटी केलेले कृत्य आहे. जाणीवपूर्वक कुणी असे करणार नाही. रस्त्यावरील गायी आणून त्यांचा सांभाळ करणारे आम्ही आहोत. त्यामुळे या गोष्टीचे सगळ्यात मोठे दु:ख आम्हाला आहे.

मठाकडून खुलासा !

या घटनेच्या संदर्भात श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाच्या उत्सव समितीने पुढीलप्रमाणे खुलासा केला आहे. कणेरी मठाच्या वतीने गेली अनेक वर्षे सहस्रो गायींचा सांभाळ केला जातो. भाकड आणि भटक्या गायींनाही सांभाळणारी आदर्श गोशाळा येथे आहे. पर्यावरण रक्षणासमवेत प्राण्यांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठीच पंचमहाभूत लोकोत्सव साजरा केला जात असून देशी प्रजाती टिकाव्यात, हाच यामागील हेतू आहे. अशा वेळी गायींचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असून लवकरच शवविच्छेदन अहवाल समोर येईल.