भ्रमणभाषवर वेळ घालवण्‍याचे प्रमाण ३२ टक्‍क्‍यांनी वाढले !

६० लाख लोकांना हवी आहे सामाजिक माध्‍यमांच्‍या जाळ्‍यातून मुक्‍ती !

संभाजीनगर – सध्‍या भ्रमणभाष हे संवादासमवेत मनोरंजन आणि ज्ञानार्जन यांचे साधन झाले आहे; परंतु ही मानसिकता एवढी वाढली की, फावल्‍या वेळेसह कामाच्‍या वेळेतही लोक भ्रमणभाषमध्‍ये गुंतलेले असतात. अशा लोकांचा दिवसाकाठी भ्रमणभाषवर जाणारा सरासरी वेळ ३ वर्षांत तब्‍बल ३२.४ टक्‍क्‍यांनी वाढला आहे, तर वर्षाकाठी तब्‍बल ६० लाख वापरकर्त्‍यांना सामाजिक माध्‍यमांच्‍या जाळ्‍यातून मुक्‍ती हवी आहे. टेलिकॉम क्षेत्रातील घडामोडींचे विश्‍लेषण करणार्‍या ‘डेटा डॉट एआय’ या संस्‍थेने ही माहिती समोर आणली.

१. गेल्‍या वर्षात भारतियांनी प्रतिदिन ४.९ घंटे भ्रमणभाषवर घालवले. झोपेचे ७ घंटे सोडले, तर २४ घंट्यांपैकी २९ टक्‍के वेळ ते भ्रमणभाषवर होते. पैकी सर्वाधिक वेळ सामाजिक संकेतस्‍थळावर घालवला.

२. एकीकडे हा वापर वाढला असतांनाच सामाजिक माध्‍यमांना वैतागणार्‍यांची संख्‍याही लक्षणीय आहे. आपले खाते बंद केले. यातही तरुण आणि कलाकार यांची संख्‍या मोठी आहे.

३. भ्रमणभाषधारक वाढत असल्‍याचे दिसत असले, तरी प्रत्‍यक्षात ते घटत आहेत. ‘ट्राय’नुसार देशात वर्ष २०२२ मध्‍ये ही संख्‍या ११४.५४ कोटी होती.

४. डिसेंबर २०२२ मध्‍ये १८ लाख घट होऊन ते ११४.३६ कोटी झाली, तरी भ्रमणभाषवर वेळ घालवणार्‍यांचे प्रमाण मात्र वाढले आहे.

५. भारतीय नागरिक वर्ष २०१९ मध्‍ये दिवसाकाठी ३.५ घंटे भ्रमणभाषवर असायचे. वर्ष २०२२ मध्‍ये हे प्रमाण ४.९ घंटे झाले. एकूण ७४८.३ अब्‍ज घंटे भ्रमणभाषचा वापर झाला.

६. कोरोनाच्‍या काळात वर्ष २०२० आणि २०२१ मध्‍ये हा वापर वाढला असावा अशी शक्‍यता होती; मात्र वर्ष २०२२ मध्‍येही ही वाढ कायम राहिली. दळणवळण बंदीच्‍या काळात सामाजिक माध्‍यमांचा वापर वाढला. नंतर तो सवयीचा भाग झाल्‍याचे तज्ञ सांगतात.

संपादकीय भूमिका

  • भ्रमणभाषवर वेळ घालवणार्‍यांनी आपला वेळ राष्‍ट्र आणि धर्म कार्यासाठी वापरला जातो का ? हे पहावे !
  • हा विज्ञानाचा दुष्‍परिणाम म्‍हणायचा का ?