भगवान बालाजी आणि श्री हनुमान यांच्याकडून जे आदेश येतात, तेच मी सांगतो ! – बागेश्‍वर धाम पीठाचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

रायपूर (छत्तीसगड) – मी कोणताही तपस्वी किंवा मनकवडा नाही. मी गादीवर (बागेश्‍वर धाम पीठाची गादी) बसलेला नसतो, तेव्हा एक सामान्य माणूस असतो; पण गादीवर बसून भगवान बालाजी आणि श्री हनुमान यांचे स्मरण केल्यानंतर जे आदेश मिळतात, तेच मी कागदावर लिहितो. लोक माझ्याकडे याचना घेऊन येतात. त्यानंतर मी माझ्या गुरूंकडून प्रेरणा घेऊन त्या याचनेवर लेखी भाष्य करतो. ते कागदावर लिहितो, अशी माहिती येथील बागेश्‍वर धाम पीठाचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला दिली. नागपूर (महाराष्ट्र) येथील अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव यांनी त्यांना चमत्कार सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. त्याविषयी त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी ही माहिती दिली. पंडित शास्त्री हे येथील दिव्य दरबारात नागरिकांच्या समस्या ऐकतात.

विशेषतः त्यांच्या मनातील गोष्ट सांगण्यापूर्वीच ते त्या समस्या एका कागदावर लिहिल्याचा दावा करतात, तसेच ते या समस्येवर उपायही सांगतात. यामुळे त्यांचे समर्थक ते एक सिद्ध पुरुष असल्याचा दावा करतात.

पंडित शास्त्री पुढे म्हणाले की, मी केवळ माझ्या ईष्ट देवांचा साधक आहे. माझ्याकडे लोक समस्या घेऊन येतात. मी केवळ त्यांच्या समस्यांवर भाष्य करतो. त्याचे निर्देश मला माझ्या गुरूंकडून मिळतात. लोकांनी त्यांची समस्या सांगण्यापूर्वीच गुरू मला जे सांगतात ती माहिती मी आधीच कागदावर लिहितो. त्यानंतर लोकच श्रद्धेने हीच आमची समस्या असल्याचे मान्य करतात. मी कागदावर लिहिलेली गोष्ट खरी आहे कि खोटी ?, हे मी नव्हे, तर लोकच सांगतात.

धर्मांतराच्या विरोधात कार्य करत असल्याने माझ्या विरोधात कट !

पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, माझ्या विरोधात कट कारस्थन रचले जाण्याची शक्यता मी यापूर्वीच व्यक्त केली होती. मी धर्मांतराच्या विरोधात अभियान चालू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून हे कारस्थान चालू आहे. माझ्या दरबारात अनेक जण भूत-प्रेताची समस्या घेऊन येतात. मी धर्मांतरित झालेल्या भोळ्या-भाबड्या लोकांना सनातन धर्माच्या मंत्रोच्चारांत ही भूतबाधा घालवण्याची शक्ती असल्याचे सांगतो; पण यासाठी ‘त्यांनी पुन्हा हिंदु धर्मात येण्याची आवश्यकता आहे’, असेही स्पष्ट करतो.’

पंडित धीरेंद्र शास्त्री आतंकवादी आक्रमणाची माहिती आधीच का देत नाहीत ?

तुम्ही ‘कोरोना महामारी येणार’ किंवा ‘आतंकवादी आक्रमण’ यांविषयी माहिती देऊन देशाला साहाय्य का करत नाही ? या प्रश्‍नावर शास्त्री म्हणाले, ‘‘मी कुणी भविष्यकार नाही कि ज्योतिषाचार्य नाही; परंतु जेव्हा कुणी दरबारामध्ये प्रश्‍न घेऊन येतात, तेव्हा मी माझ्या आतली प्रेरणा आणि अनुभूती यांच्या आधारे समस्यांचे निवारण करतो. जेव्हा एखादा राजकीय नेता माझ्याकडे येऊन राज्याविषयी प्रश्‍न विचारतो, तेव्हा मी योगायोग आणि संभाव्यता सांगतो; परंतु कुणी काही मागणे मांडणार नसेल, तर प्रश्‍न सुटतील तरी कसे ?’’