हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा पार पडला. या दौर्‍यामध्ये त्यांनी संत, हिंदुत्वनिष्ठ आणि लोकप्रतिनिधी यांची भेट घेतली. या दौर्‍याचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत.

१. ‘ॐ कार टिव्ही’चे संस्थापक आणि संचालक श्री. मुकुंद शर्मा यांची घेतली भेट !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘ॐ कार टिव्ही’चे संस्थापक आणि संचालक श्री. मुकुंद शर्मा यांची भेट घेतली. ही भेट ‘ॐ कार फाऊंडेशन’चे प्रमुख संरक्षक श्री. कृष्णप्रसाद खनाल यांनी घडवून आणली. या वेळी श्री. शर्मा यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘जे केवळ विज्ञानवादी असतात, ते केवळ शरिराची भूक मिटवण्याचा प्रयत्न करतात; परंतु स्वतःचे जीवन आनंदमय होण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन विज्ञानात मिळत नाही. जीवनात शांती आणि आनंदप्राप्ती यांचा विषय आला की, सनातन धर्माची भूमिका येते. आपल्या धर्मातील गुरुपरंपरेनुसार साधना करून धर्माची ज्योत पेटवा आणि धर्मपरायण समाज निर्माण करा. आज समाजाला धर्मपरायण करण्याची आवश्यकता आहे. जेथे धर्मपरायण समाज निर्माण होईल, तेथे त्या समाजाचे रक्षण हाईल आणि जेथे अधर्म असेल, तेथे भीषण परिस्थिती उद्भवणार, असे द्रष्ट्या पुरुषांनी सांगितले आहे.’’

२. ‘न्यूज नेपाल’ वाहिनीवरील ‘मिशन विझडम्’ कार्यक्रमामध्ये वार्तालापाचे आयोजन

‘न्यूज नेपाल’ वाहिनीचे मार्केटिंग व्यवस्थापक श्री. प्रकाश शेडाय यांनी ‘न्यूज नेपाल’ वरील ‘मिशन विझडम्’ या कार्यक्रमासाठी सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या मुलाखतीचा वार्तालाप आयोजित केला. या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी ‘मिशन विझडम्’ या कार्यक्रमाचे संचालक आणि ‘त्रिचंद्र विश्वविद्यालया’चे प्रा. गोविंद शरण उपाध्याय यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘उपासना पद्धतीचा धर्माशी काही संबंध नाही. धर्म एक व्यापक गोष्ट आहे की, जी केवळ मनुष्य नाही, तर प्राणीमात्रांनाही लागू आहे. पाश्चात्त्य विचारांच्या आक्रमणांचे कारण आपले शासनकर्ते आहेत. दुर्दैवाने आपल्याला पाश्चात्त्य संस्कृतीचे दास्यत्व स्वीकारलेले शासनकर्ते लाभले आहेत. धर्माचे आचरण केल्याने धर्माची अनुभूती येते. धर्म हा चर्चा आणि चिंतन यांचा विषय नसून तो अनुभूतीचा विषय आहे.’’

३. ‘न्यूज नेपाल’चे संस्थापक तथा संचालक श्री. उदय राज ढकाल यांची भेट

‘न्यूज नेपाल’चे संस्थापक तथा संचालक श्री. उदय राज ढकाल यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांची उत्स्फूर्त भेट घेतली आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य जाणून घेतले. या वेळी श्री. ढकाल यांनी ‘भारताप्रमाणे नेपाळमध्येही अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन चालू आहे’, याविषयी चिंता व्यक्त केली. या भेटीनंतर श्री. ढकाल यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांना पुन्हा भेटण्याची विनंती केली.

४. पशुपतिनाथ मंदिराचे विश्वस्त श्री. अर्जुन प्रसाद बस्तोला यांच्याकडून सद्गुरु डॉ. पिंगळे यांचा सन्मान

‘संहिता शास्त्री’ श्री. अर्जुन प्रसाद बस्तोला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा सन्मान करतांना

‘संहिता शास्त्री’ आणि ‘पशुपतिनाथ मंदिरा’चे विश्वस्त श्री. अर्जुन प्रसाद बस्तोला यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांची सदिच्छा भेट घेऊन भावपूर्ण सन्मान केला. या वेळी पशुपति क्षेत्र विकास कोषाचे कार्यकारी निर्देशक डॉ. घनश्याम खतिवडा उपस्थित होते. त्यांनीही पशुपति क्षेत्र विकास कोषाद्वारे प्रकाशित विशेष ग्रंथ ‘पशुपति क्षेत्र’ भेट देऊन सद्गुरु डॉ. पिंगळे यांचा सन्मान केला.

५. ‘लोकतांत्रिक समाजवादी पक्षा’चे श्री. मनिष मिश्रा यांच्याशी भेट

‘लोकतांत्रिक समाजवादी पक्षा’चे सर्वश्री मनिष मिश्रा आणि जय निशांत यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी भारतात चालणारे हिंदु जनजागृती समितीचे कार्य थोडक्यात समजून घेतले. त्यांच्याशी चर्चा करतांना सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘राजकीय लाभांसाठी अल्पसंख्यांक आणि धर्मांध यांचे लांगूलचालन केले, तर एक दिवस तेच आपल्या अस्तित्वावर संकट बनून उभे राहतील. जसे आज काही युरोपीय देशात घडत आहे.’’

६. पशुपती सांगवेद विद्यालयाचे स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्याशी भेट

सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी पशुपती सांगवेद विद्यालय, नवलपरासी येथील स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांची प्रथमच भेट घेतली. या वेळी स्वामीजींनी समितीचे कार्य जाणून घेतले. ते म्हणाले, ‘‘हा आश्रम आपलाच आहे. तुम्ही कधीही नि:संकोच येथे येऊन राहू शकता.’’

७. डॉ. सम्मोदाचार्य कौडिण्य यांच्याशी भेट

‘फार्मकलॉजी’ विभागाचे प्रमुख डॉ. सम्मोदाचार्य कौडिण्य यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांची भेट घेतली. या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘संस्काराविना स्पर्धा हानीकारक आहे. चेतनाशक्ती जागृत नसणारी व्यक्ती विकली जाते. आपण आपली परंपरा पुढच्या पिढीला देत नाही, म्हणजे आपली आपल्या परंपरेवर श्रद्धा नाही.’’

८. ‘लिडरशिप अकादमी’चे श्री. संतोष शहा यांच्याशी भेट

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘लिडरशिप अकादमी’चे श्री. संतोष शहा यांची भेट घेतली. या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘आपल्याला आपला देश स्वतंत्र झाला आहे, असे वाटते; पण आपल्या देशात आपली शिक्षण, न्याय, राज्य यांच्या व्यवस्था आणि आपली संस्कृती कुठेच दिसून येत नाही. हे सर्व पालटून खर्‍या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.’’

९. लटकू नदीच्या तिरावरील लटकेश्वर महादेव मंदिराचे दर्शन

सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी लटकू नदीच्या तिरावरील लटकेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी उपस्थितांना सांगितले, ‘‘विष हे तेजतत्त्व आहे. अग्नीच्या ज्वाळा उर्ध्व दिशेला जातात. त्यामुळे विषाचा प्रभाव उच्च आणि दैवी लोकांत होऊ नये, तसेच तो जर व्हायचा असेल, तर तो असुर लोकात होऊ दे, यासाठी शिवाने हे उलटे लटकणारे रूप धारण केले आहे. हे रहस्य जाणून जो या तीर्थावर माझी उपासना करील आणि जीवनातील प्रतिकूलता अन् संकटे यांना जो साधना करत सामोरे जाईल, तो जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होईल.’’

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

त्रिचंद्र विश्वविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. गोविंद शरण उपाध्याय यांचा प्रेमभाव

त्रिचंद्र विश्वविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. गोविंद शरण उपाध्याय यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांना त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले आणि ‘यापुढे धर्मशाळेत न रहाता त्यांच्या घरीच निवास करा’, अशी त्यांना आग्रहाची विनंती केली.

धर्माभिमानी श्री. नरसिंह थापा यांचा सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्याविषयी भाव

पूर्वी भारतात रहाणारे आणि हिंदु जनजागृती समितीशी जुडलेले श्री. नरसिंह थापा आणि सौ. घमिस्त्रा थापा यांच्या घरी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी भेट दिली. तेव्हा श्री. थापा यांचा भाव जागृत झाला. ते म्हणाले, ‘‘लोक गुरु शोधायला जातात आणि आज गुरूच स्वत:हून माझ्या घरी आले.’’