राहुल गांधी यांना अटक करा ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर खोटा आरोप केल्याचे प्रकरण

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याविषयी ‘रिट्वीट’ (टि्वटरवरून दुसर्‍याच्या टि्वटर खात्यावरील मजकूर स्वतःच्या खात्यावरून पुन्हा प्रसारित करणे) करणार्‍या एका अभिनेत्रीला एक मास कारागृहात ठेवण्यात आले होते. शरद पवार यांची झालेली अपकीर्ती चुकीची होती; पण जो न्याय त्यांना दिला, तोच न्याय स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीही असायला हवा. गुन्हा करणारी व्यक्ती लहान आहे कि मोठी ?, याकडे कायदा पहात नाही. सावरकर निश्‍चितच शरद पवार यांच्यापेक्षा मोठे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर खोटा आरोप करणार्‍या राहुल गांधी यांना अटक व्हावी, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू तथा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी सरकारकडे केली.

वाशिम येथे ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधी यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्रजांसाठी काँग्रेसच्या विरोधात काम करायचे’, असा सावरकरांना राष्ट्रविरोधी ठरवणारा आरोप केला होता. त्यास प्रत्त्युत्तर देतांना श्री. रणजित सावरकर वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

श्री. सावरकर पुढे म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांनी प्रचारासाठी काढलेल्या यात्रेत देशभक्तांचा अपमान करण्याचे उद्योग होणार असतील, तर या यात्रेवर बंदी घातली पाहिजे. काँग्रेसनेच हा पायंडा पाडला आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती केली, तर मते मिळतील’, असा राहुल गांधी यांचा समज आहे; पण ते एका देशभक्तावर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करत आहेत. याआधीही त्यांनी असे उद्योग केले आहेत. स्वातंत्र्यवीर सावकर यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी करण्याचा संजय राऊत यांना काय अधिकार आहे ? त्यांचे काँग्रेससारखे सहकारी पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर यांना नियमितपणे शिव्या देत आहेत. काँग्रेसच्या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह लेख लिहिण्यात आला, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी भेटण्यासाठी गेलो होतो; पण त्यांनी मला भेट नाकारली. मी जे पत्र दिले, त्याचे उत्तर देण्याचे सौजन्यही ठाकरे यांनी दाखवले नाही. सत्तेच्या मोहासाठी तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती खपवून घेता. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्यावा’, अशी मागणी आमच्या कुटुंबाने केलेली नाही आणि करणारही नाही.’’