दोषींवर कठोर कारवाई करून ‘मकोका’ लावणार ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

  • कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलीस निरीक्षकाला नियंत्रण कक्षात पाठवले !

  • वेदांत बंडगर हत्या प्रकरण

पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, १७ जून (वार्ता.) – येथील निष्पाप तरुण वेदांत बंडगर यांच्या हत्येची घटना अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. या नराधम गुन्हेगारांना पाठीशी घालणार्‍या कुणाचीही गय केली जाणार नाही. अन्वेषणात कोणताही राजकीय दबाव खपवून घेतला जाणार नाही, अशी चेतावणी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

या प्रकरणी मुख्य आरोपी नीलेश गडदे आणि अतुल वायदंडे यांना अटक झाली असून १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे; तर उर्वरित ३ आरोपींचा शोध चालू आहे. गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी या प्रकरणात ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावला जात आहे, तसेच यापूर्वी हलगर्जीपणा करणार्‍या संबंधित पोलीस निरीक्षकाला तातडीने नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले आहे. (कर्तव्यात कसूर करण्यासाठी एका ठिकाणाहून स्थानांतर करणे म्हणजे अन्य ठिकाणीही कर्तव्यात कसूर करण्याची संधी देणे नाही का ? – संपादक)

काय आहे प्रकरण ?

मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून खरात आणि गडदे गटांत वाद होता. या कामाचा ठेका लक्ष्मण खरात यांच्याकडे आहे. खरात यांनी हे काम सोडावे म्हणून संशयित नीलेश गडदे दबाव आणत होता. १० जूनच्या सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास २ साथीदारांसह गडदे हा खरात यांच्या घरात गेला. तेथे खरात नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला धमकावून खंडणीही मागितली. खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे गेले. गडदेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यासाठी हमाल जमताच २ गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या चारचाकीवर दगडफेक केली. त्याच रागातून गडदे याने बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी सांगली गाठली. त्या वेळी अंगणात भ्रमणभाष पहात बसलेला बंडगर यांचा नातू वेदांतवर गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला. गडदे कर्नाटक सीमा भागातील एका ‘लॉज’वर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तेथे धाड घालून पोलिसांनी त्याला अटक केली.