गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात भाजप जनतेची फसवणूक करत आहे ! – केजरीवाल

भावनगर (गुजरात) – गुजरातमध्ये समान नागरी कायदा अंमलात आणण्यासंदर्भात भाजप जनतेची फसवणूक करत आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपने हेच आश्‍वासन दिले होते; पण निवडणुका जिंकल्यानंतर त्याची कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप देहलीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भावनगर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते

गुजरातमधील भाजपशासन राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या सिद्धतेत आहे. शासनाने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.

केजरीवाल पुढे म्हणाले की,

१. जर भाजपला समान नागरी कायदा लागू करायचाच आहे, तर तो उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे का लागू करत नाही ?

२. समान नागरी कायद्याविषयी भाजपला खरंच आस्था असेल, तर राष्ट्रीय स्तरावरच लागू करण्यासाठी तो का प्रयत्न करत नाही ? वर्ष २०२४ मधील लोकसभा निवडणुकींसाठी भाजप थांबला आहे का ?

३. समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे. राज्यघटनेच्या कलम ४४ मध्ये हा कायदा लागू करणे राज्याचे दायित्व असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे; मात्र हे सर्वांच्या संमतीने झाले पाहिजे. (असे आहे, तर केजरीवाल यांनी देहलीमध्ये समान नागरी कायदा लागू होण्यासाठी काहीच प्रयत्न का केले नाहीत ?, याविषयी त्यांनी प्रथम बोलले पाहिजे ! – संपादक)