सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते, ते आमच्याकडे आहे. या देशात जे काही निर्णय होतात ते घटना, नियम यांच्या आधारेच होत असतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्व गोष्टींचा विचार करून स्थगितीची मागणी फेटाळली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

शिंदे पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगही एक घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे ऐकायचे नाही, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. लोकशाहीत हे अपेक्षित होते, आम्ही कायद्याच्या विरोधात जाऊन निर्णय घेतलेला नाही. घटनातज्ञांनाही हेच वाटत होते.

अपात्रतेसंदर्भातील ज्या काही नोटिसा देण्यात आल्या होत्या, त्या सर्व चुकीच्या होत्या; कारण ज्यांनी अपात्रतेची नोटीस दिली, त्यांच्या विरोधातच अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. महाविकास आघाडीचे सरकार असतांना वाटेल त्या पद्धतीने नोटीस दिल्या. त्यांना तसा कोणताही अधिकार नव्हता, असे शिंदे यांनी सांगितले.