(म्हणे) ‘भारत आता धर्मनिरपेक्ष राहिलेला नाही !’  

इस्लामीस्तान असणार्‍या पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचे नक्राश्रू !

बिलावल भुट्टो

न्यूयॉर्क (अमेरिका) – आमचा फार जुना आणि गुंतागुंतीचा इतिहास आहे. दुर्दैवाने आजचा भारत पालटलेला आहे. स्थापनेच्या वेळी नागरिकांना आश्‍वस्त केलेला धर्मनिरपेक्ष भारत आता राहिलेला नाही. भारत आता हिंदूंचे वर्चस्व असणारा देश बनत आहे. केवळ भारतातच नाही, तर दुर्दैवाने अवैधरित्या नियंत्रण मिळवलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्येही हे दिसत आहे, असा फुकाचा आरोप पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी केला. पाकिस्तानमध्ये गेल्या काही आठवड्यात पूर आल्यानंतर भारताने कोणतेही साहाय्य केले नसल्याचे सांगत भुट्टो यांनी अप्रसन्नताही व्यक्त केली. ते येथे ‘फ्रान्स २४’ या वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते.

(म्हणे) ‘भारतातील मुसलमान असुरक्षित !’

भुट्टो पुढे म्हणाले की, भारतात अल्पसंख्य असणारे मुसलमान असुरक्षित आहेत. भारत ज्या प्रकारे त्याच्या मुसलमान नागरिकांना वागणूक देत आहे, ते पाहून तो पाकिस्तान आणि काश्मीरमधील मुसलमानांना कशी वागणूक देत असेल, याचा विचार करा. (खोटे बोला रेटून बोला !, अशा वृत्तीचे भुट्टो ! भुट्टो यांच्या परिवाराचा हाच इतिहास राहिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळी अपेक्षाही करता येत नाही ! पाकने त्याच्या देशातील हिंदूंना कशा प्रकारची वागणूक आतापर्यंत दिली आहे आणि तो देत आहे, हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे. त्याविषयी भुट्टो कधी तोंड उघडणार नाहीत ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

‘भारत लवकरच हिंदु राष्ट्र होणार आहे’, हे भुट्टो यांनी लक्षात ठेवावे ! ज्या देशाने धर्माच्या आधारे झालेल्या फाळणीनंतर स्वतःला इस्लामी देश घोषित केले आणि त्या आधारे गेली ७५ वर्षे कारभार केला त्याने ‘भारत धर्मनिरपेक्ष राहिलेला नाही’, असे बोलणे हास्यास्पदच होय !