रा.स्व. संघ आणि हिंदु नेते यांच्या हत्येचा कट उघड !

बरेली येथून खलिस्तानी आतंकवाद्याला अटक

नवी देहली – देहली पोलिसांच्या विशेष शाखेने उत्तरप्रदेशातील बरेली येथून खलिस्तानी आतंकवादी रणदीप सिंह उपाख्य एस्.के. खरौद याला अटक केली आहे. त्याच्याकडून चिनी पिस्तूलासह एकूण ५ अधुनिक पिस्तुले, काडतुसे, काही भ्रमणभाष संच आणि सीमकार्ड जप्त केले आहेत. त्याच्या चौकशीतून पाकिस्तानमध्ये लपलेल्या खलिस्तानी आतंकवाद्यांनी भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदूंचे नेते यांची हत्या करण्याचे षड्यंत्र रचल्याचे उघड झाले आहे. खलिस्तानी आतंकवादी हरविंदर सिंह उपाख्य रिंदा या षड्यंत्रामागे असल्याचे समोर आले आहे.

पोलीस अधिकारी एस्.जी.एस्. धालीवाल यांनी म्हटले की, गेल्या काही काळापासून आपण पहात आहात की, आतंकवाद्यांनी हत्या करण्यासाठी भारतातील गुंडांना हाताशी धरलेले आहे. अटक करण्यात आलेला रणदीप सिंह हा रिंदा याच्या सतत संपर्कात होता. त्याला धर्मासाठी काम करण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी हिंदु नेत्यांना ठार करण्याचे दायित्व देण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

जिहादी आणि आता खलिस्तानी दोघेही हिंदूंना लक्ष्य करत आहेत, हे लक्षात घेता हिंदूंचे रक्षण कोण करणार ? ही स्थिती पालटण्यासाठीच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे !