Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !

नवी देहली – देशातील सर्वांत मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा असलेल्या ‘नीट’ची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे निर्माण झालेला वाद, अनेक आठवडे चाललेली तीव्र निदर्शने आणि सर्वच स्तरांतून वाढलेला दबाव, या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी २५ जुलैच्या दुपारी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे त्यागपत्र सादर केले आहे. ‘कॉकरोच जनता पक्षा’ने आरंभीपासूनच प्रधान यांच्या त्यागपत्राची मागणी केली होती आणि ते स्वतःच्या भूमिकेवर ठाम होते. सरकार आणि कॉकरोच जनता पक्ष यांच्यातील चर्चेच्या तिसर्‍या फेरीपूर्वीच प्रधान यांनी त्यांचे त्यागपत्र दिले.

दूरदर्शी शिक्षण प्रणाली, हाच एका सशक्त राष्ट्राचा पाया !

प्रधान यांनी ‘एक्स’द्वारे त्यांच्या त्यागपत्राची प्रत प्रसारितही केली आहे. त्यात ते म्हणाले,

१. माझ्या तरुण मित्रांनो, ४ दशकांहून अधिक काळ मी विद्यार्थी, अध्यापन आणि शिक्षण सुधारणांच्या क्षेत्रासाठी स्वतःला समर्पित केले आहे. एक सशक्त, सर्वसमावेशक आणि दूरदर्शी शिक्षण प्रणाली हाच एका सशक्त राष्ट्राचा पाया असतो, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे.

२. देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि वाजवी अपेक्षा यांचा मी मनापासून आदर करतो. भारताच्या तरुण पिढीची स्वप्ने पूर्ण करणे, ही माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक नैतिक बांधिलकी राहिली आहे. पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याविषयी मी त्यांचे आभार मानतो.

३. ३ मे २०२६ या दिवशी झालेल्या ‘नीट’च्या परीक्षेत अनियमितता आढळून आली होती. या प्रकरणाची तातडीने नोंद घेत भारत सरकारने याचे अन्वेषण सीबीआयकडे सोपवले, परीक्षा रहित केल्या आणि फेरपरीक्षेचा दिनांक घोषित केला. तसेच पुढील वर्षापासून ही परीक्षा संगणक-आधारित चाचणी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

४. या संपूर्ण प्रक्रियेच्या वेळी २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी परीक्षा सुरळीतपणे पार पडेल, याची निश्चिती करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य होते. ‘संपूर्ण-सरकार समन्वित दृष्टीकोन’ स्वीकारून हे काम करण्यात आले.

विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही !

प्रधान यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही. पहिल्या दिवसापासूनच मी या प्रकरणाचे दायित्व स्वीकारले होते आणि कधीही या परिस्थितीपासून दूर पळालो नाही. ‘परीक्षा माफिया’मुळे गुणवान विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होऊ दिले जाणार नाही आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही.

संपादकीय भूमिका

शिक्षण मंत्र्यांच्या त्यागपत्रानंतरही जर ‘कॉकरोच जनता पक्षा’ने आंदोलन चालू ठेवले, तर आता त्याच्या मागण्या आणि दिशा राजकीय स्तरावर गेल्याचेच म्हटले पाहिजे !