(म्हणे) ‘भारत सरकारचे हिंदुत्वाचे धोरण उघड होते !’ – मेहबूबा मुफ्ती

काश्मीरमधील शाळेत विद्यार्थ्यांकडून ‘रघुपती राघव राजाराम’ भजन म्हणून घेण्यावर आक्षेप !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरच्या नागाम येथील एका सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन गातांनाचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यावर काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी टीका केली आहे. ट्वीट करून त्यांनी म्हटले आहे, ‘धार्मिक विद्वानांना कारागृहात टाकणे, जामा मशीद बंद करणे आणि आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हिंदु भजन गाण्यास सांगणे, हे भारत सरकार राबवत असलेले हिंदुत्वाचे धोरण उघड करते. सरकारच्या आदेशांना नाकारणे म्हणजे स्वतःवर गुन्हा नोंदवण्यास आमंत्रित करणे आहे. पालटत्या जम्मू-काश्मीरसाठी आम्ही किंमत चुकवत आहोत.’

मेहबूबा मुफ्ती यांनी पुढे म्हटले आहे की, आम्ही भजनाचा सन्मान करतो; मात्र मुसलमानांकडून भजन गाऊन घेणे… माझा त्यांना प्रश्‍न आहे की, ते काय करू इच्छित आहेत ? तुम्ही गांधी यांना मारणार्‍या गोडसेची पूजा करता आणि आम्हाला गांधींचा धडा शिकवता. आम्ही गांधींना जाणतो आणि मानतो.

संपादकीय भूमिका

एकीकडे ‘गांधी यांना मानतो’ असे म्हणायचे आणि दुसरीकडे ते गात असलेल्या भजनाला ‘ते हिंदूंचे आहे’, असे सांगत विरोध करायचे, हा मेहबूबा मुफ्ती यांचा दुटप्पीपणाच होय !