हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संपूर्ण भारतभर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त उपक्रमांच्या आयोजनासाठी मुंबई येथे पत्रकार परिषद

डावीकडून हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, वसई (मेधे) येथील श्री परशुराम तपोवन आश्रमाचे संचालक भार्गव श्री. बी.पी. सचिनवाला आणि लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल

मुंबई, २१ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या उद्देशाने अविरतपणे कार्यरत असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २६ सप्टेंबर या दिवशी अर्थात् घटस्थापनेच्या दिनी २० वर्षे पूर्ण होत आहेत. समितीच्या द्विदशक-पूर्तीनिमित्त मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसह संपूर्ण भारतभर व्यापकस्तरावर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जात आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी २१ सप्टेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल आणि वसई येथील श्री परशुराम तपोवन आश्रमाचे संचालक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला उपस्थित होते.

श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियानात ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’, ‘हिंदु धर्माची महानता’, ‘शौर्य जागरणाची आवश्यकता’, ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’ इत्यादी विषयांवरील व्याख्याने, हिंदु राष्ट्र जागृती करणारी फलकप्रसिद्धी करणे, मंदिरे, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, महिला संघटनाचे उपक्रम, स्वसंरक्षण प्रशिक्षण आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यानिमित्त पनवेल येथे नुकताच हिंदूसंघटन मेळावा घेण्यात आला असून मुंबई येथेही असा हिंदूसंघटन मेळावा घेण्यात येणार आहे. ‘हिंदु राष्ट्र परिसंवाद’, हिंदुत्वनिष्ठ संघटना, अधिवक्ते यांच्या बैठका आदी उपक्रम देशभरात राबवले जाणार आहेत. ३१ ऑगस्टपासून चालू झालेले हे अभियान नोव्हेंबरपर्यंत राबवले जाईल.’’

हिंदु राष्ट्रासाठी हिंदूंनी कृतीशील व्हावे, यासाठी उपक्रमांचे आयोजन ! – भार्गव श्री बी.पी. सचिनवाला, संचालक, श्री परशुराम तपोवन आश्रम, वसई

भार्गव श्री बी.पी. सचिनवाला

हे अभियान चालू झाल्यापासून आतापर्यंत समितीच्या विविध उपक्रमांना समाजातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हिंदु समाजमनात हिंदु राष्ट्राचा संकल्प दृढ व्हावा आणि हिंदु समाजाने हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील व्हावे, या दृष्टीने उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

हिंदु जनजागृती समितीने सातत्याने केलेल्या जागृतीमुळे हिंदू कृतीशील झाले आहेत ! – ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल,

मागील २० वर्षे सातत्याने केलेल्या जागृतीमुळे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन रोखण्यासाठी राज्यातच नव्हे, तर भारतभरात हिंदू कृतीशील झालेले दिसत आहेत. धर्मशिक्षण, धर्मजागृती, हिंदूसंघटन, राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण या पंचसूत्रीच्या आधारे समितीकडून वर्षभर विविध उपक्रम देशभर राबवले जातात. हे सर्व कार्य ईश्‍वरी कृपा, संतांचे आशीर्वाद आणि हिंदुत्वनिष्ठांचा कृतीशील सहभाग यांमुळे होत आहे, अशी कृतज्ञतापर भावना या वेळी श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी व्यक्त केली.