पतंजलीची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र ! – योगऋषी रामदेव बाबा

योगऋषी रामदव बाबा

नवी देहली – आतापर्यंत पतंजलीने ५ लाखांपेक्षा अधिक तरुणांना रोजगाराची संधी दिली आहे. तरीदेखील पतंजलिविरुद्ध षड्यंत्र रचले जात आहे. सरकारी नियमानुसार, पतंजलि आस्थापन विविध उत्पादनांची निर्मिती करते. तरीदेखील अनेक क्षेत्रांतील माफीया पतंजलीला संपवण्यासाठी षड्यंत्र रचत आहेत. माफियांचे मोठे षड्यंत्रच काम करत आहे. यात विशेष करून काही वृत्तवाहिन्यांनी पतंजलीची अपकीर्ती करण्याचा जणू विडा उचलला आहे, असा आरोप पंतजलि समूहाचे प्रमुख योगऋषी रामदेवबाबा यांनी पत्रकार परिषदेत केला. पतंजलि समूहाच्या वाटचालीविषी ते माहिती देत होते.

योगऋषी रामदेवबाबा यांनी मांडलेली सूत्रे

१. पतंजलीच्या प्रयोगशाळेत ५०० हून अधिक संशोधक काम करत आहेत. तरीदेखील विविध दोष शोधून आमच्या उत्पादनांची अपकीर्ती केली जाते; मात्र षड्यंत्र रचणार्‍यांच्या  हातात अद्याप काही मिळालेले नाही; कारण आम्ही सरकारच्या नियमानुसार काम करतो. सरकारकडे नसेल इतकी अत्याधुनिक प्रयोगशाळा पतंजलीकडे आहे.

२. पतंजलीच्या विरोधात षड्यंत्र रचणार्‍यांना बाबा रामदेव जणू आतंकवादी किंवा आरोपी आहेत, असे वाटत आहे; मात्र हे योग्य नाही.

३. पतंजलि समूहाने पुढील ५ वर्षांत पतंजलि समूहासाठी १ लाख कोटी रुपयांची उलाढाल साधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर राष्ट्र उभारणीसाठी ५ लाख थेट रोजगार निर्माण करण्याची योजना चालू आहे.