भारत सरकारने शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देहत्यागामुळे राष्ट्रीय दुखवटा घोषित करावा ! – हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

मुंबई – ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाल्यावर भारत सरकारने एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला. तसे पाहिले, तर त्यांचे भारताच्या उत्कर्षात कोणतेही योगदान नाही. उलट ब्रिटिशांनी भारतावर १५० वर्षे राज्य करून भारतियांवर अनन्वित अत्याचारच केले. त्या देशाच्या महाराणीच्या निधनाविषयी भारत सरकार राष्ट्रीय दुखवटा घोषित करते; मात्र देशासाठी स्वत:चे जीवन समर्पित करणारे भारताचे सुपुत्र तथा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेणारे हिंदु धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या देहत्यागानंतर राष्ट्रीय दुखवटा घोषित होत नाही, हे दुर्दैवी आहे. भारत सरकारने हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंच्या देहत्यागाविषयी ‘राष्ट्रीय दुखवटा’ घोषित करून त्यांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे.

या मागणीत समितीने म्हटले आहे की, शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वांत मोठे धर्मगुरु होते. भगवान आदि शंकराचार्य यांनी भारतात स्थापन केलेल्या चार पीठांपैकी द्वारका येथील शारदापीठ आणि बद्रीनाथ येथील ज्योतिषपीठ या दोन पीठांचे ते शंकराचार्य होते. हिंदुबहुल भारत शंकराचार्यांसाठी राष्ट्रीय दुखवटा घोषित करणार नाही, तर कुठे करणार ? गेल्या ७० वर्षांत काँग्रेसी नेत्यांनी हिंदूंच्या धर्मगुरूंचा अपमानच केला आहे. आता हिंदुत्वनिष्ठ मोदी शासनाच्या काळात धर्मगुरूंचा यथोचित सन्मान होईल अशी आशा आहे, असेही श्री. शिंदे या वेळी म्हणाले.

संपादकीय भूमिका

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारने शंकराचार्यांचा यशोचित सन्मान करणे हिंदूंना अपेक्षित आहे !