चर्चद्वारे संचलित सर्व आश्रयकेंद्रांची नियमित चौकशी आणि पहाणी करा ! – अनिल धीर, राष्ट्रीय महामंत्री, भारत रक्षा मंच

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद ‘चर्चद्वारे संचलित आश्रयकेंद्रे कि अत्याचार केंद्रे ?’

मुंबई – देशातील विविध भागांतील चर्चमध्ये जेव्हा लहान मुलांचे लैंगिक शोषण आणि महिलांवरील अत्याचार अशा घटना घडतात, तेव्हा शहरात काही प्रमाणात ही प्रकरणे उजेडात तरी येतात. ही उजेडात आलेली प्रकरणे केवळ हिमनगाचे टोक आहेत; मात्र आदिवासीबहुल आणि ग्रामीण भागात जेव्हा चर्चशी संबंधित अशा घटना घडतात, तेव्हा त्याविषयी कुणाला काही कळतसुद्धा नाही. भारतात चर्चच्या वतीने चालू असलेले अपप्रकार पहाता चर्चद्वारे संचलित सर्व आश्रयकेंद्रांची राज्य सरकारांनी नियमित चौकशी आणि पहाणी करावी, अशी मागणी भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय महामंत्री श्री. अनिल धीर यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘चर्चद्वारे संचलित आश्रयकेंद्र कि अत्याचार केंद्र ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

श्री. अनिल धीर पुढे म्हणाले की, जेव्हा चर्चमध्ये अत्याचार होतात, तेव्हा मुख्य प्रसारमाध्यमे (मेनस्ट्रीम मीडिया) शांत असतात; मात्र हिंदु साधु आणि संत यांच्यावर आरोप होतात, त्या वेळी तो विषय उचलून धरला जातो, हा दुटप्पीपणा आहे. भारतातील चर्चसाठी मोठ्या प्रमाणात विदेशातून पैसा पुरवला जातो. यावर सरकारचे काहीही नियंत्रण नाही.

चर्चमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे होत असतांना त्यावर कधी चर्चा होत नाही ! – एस्टर धनराज, अभ्यासक, ख्रिश्चन स्टडीज

ख्रिस्ती संस्था या महिला आणि लहान मुले यांच्या शोषणाचे केंद्र बनत आहेत. हे नवीन नसून १९८० च्या दशकापासून चर्चमधील अत्याचारांची प्रकरणे संपूर्ण जगभरातून उजेडात आली. चर्चमधील अत्याचारांमागे कारणीभूत असलेल्या पाद्र्यांना वेगवेगळ्या चर्च व्यवस्थापनाने शिक्षा न करता पाठीशी घातले. भारतासह जगभरातील या सर्व चर्चमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे होत असतांना याविषयी चर्चाही कुठे होतांना दिसत नाही; मात्र मंदिरांत पैशांचा गैरव्यवहार होईल, हे कारण पुढे करून अजूनही सरकारने मंदिरे आपल्या कह्यात ठेवली आहेत.

गैरप्रकार होत असलेल्या चर्चच्या आश्रयकेंद्रांची नोंदणी कायमची रहित करा ! – प्रतीक्षा कोरगावकर, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

प्रतीक्षा कोरगावकर

नवी मुंबई येथील ‘बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या चर्चमधील वसतीगृहातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे नुकतेच समोर आले. लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर अशी अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. या प्रकरणासह देशभरात सर्वत्र चर्चच्या अंतर्गत असलेल्या आश्रयकेंद्रांच्या चौकशीसाठी सरकारने समिती नेमावी, तसेच गैरप्रकार होत असलेल्या चर्चच्या आश्रयकेंद्रांची नोंदणी कायमस्वरूपी रहित करावी, अशी ‘रणरागिणीं’ची मागणी आहे.

पालकांनी चर्च, कॉन्व्हेंट आदी ठिकाणी आपल्या मुलांना पाठवतांना, तसेच तेथे काय शिकवले जात आहे ? याविषयी सतर्क रहायला पाहिजे, तसेच चर्च संस्थांच्या संदर्भात अपप्रकार लक्षात आल्यास त्या विरोधात तक्रार करायला हवी.