धर्माधर्मांत भांडणे लावणार्‍या काँग्रेसला भारत जोडण्याची स्वप्ने पडत आहेत !

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेवर टीका

ठाणे, १२ सप्टेंबर (वार्ता.) – ब्रिटीश भारतामधून गेल्यानंतरही त्यांच्याच विचारांनी काँग्रेसने देशात कारभार केला. ती काँग्रेस आता भारत जोडण्यासाठी यात्रा काढत आहे, हे आश्चर्यकारक आहे. आम्ही तोडफोड करून कधीही राज्य करत नाही. आधी काँग्रेसने तोडण्याचे काम केले, धर्माधर्मांत भांडणे लावली. आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर काँग्रेसला भारत जोडण्याची स्वप्ने पडू लागली, अशी टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेवर केली.

केंद्रीय लोकसभा मतदारसंघाचा दौरा करण्यासाठी केंद्रीय मंत्री ठाकूर ११ सप्टेंबरपासून ३ दिवसांच्या कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर दौर्‍यावर आले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या समवेत ते संवाद साधत आहेत. ठाकूर यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयघोष करण्यात आला.

डोंबिवली एम्.आय.डी.सी.तील रिजन्सी अनंतम प्रवेशद्वारासमोरील चौकात मंत्री अनुराग ठाकूर यांचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, ग्रामीण अध्यक्ष नंदू परब यांनी स्वागत केले. कल्याण लोकसभा शिवसेनेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही पुष्पगुच्छ देऊन मंत्री ठाकूर यांचे स्वागत केले.

येत्या वर्षभरात अयोध्येत राममंदिर सिद्ध होणार असल्याचे प्रतिपादन !

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ठाकूर म्हणाले, ‘‘जय श्रीराम’चा जयघोष तुम्ही आता करत असलात, तरी त्यासाठी आपल्याला ४०० वर्षे लढावी लागली. रामललाचा जन्म झाला. त्या ठिकाणी भव्य राममंदिर असावे, यासाठी सर्व भारतवासी विचार करत होते. यासाठी आपल्याला न्यायालयात लढाई लढावी लागली. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर अयोध्येचा विषय अधिक गतीमान झाला. येत्या वर्षभरात अयोध्येत राममंदिर सिद्ध होईल. आपले अनेक वर्षांचे स्वप्न साकार होईल.’’