विकासाचा पुनःश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

मुंबई – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या कृपेने गेल्या दोन वर्षांतील कोरोना संकटाचे मळभही आता दूर झाले आहे. त्यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्साहात, आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. गणरायाचे  आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो. लाडक्या गणरायाचे स्वागत करतांना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनःश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न करूया, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे की, उत्सव साजरा करतांना सामाजिक भान जपणे आवश्यक आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यांसारख्या विषयांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भर देऊन जनजागृती करावी. राज्याच्या विकासाचे मनोरथ पूर्णत्वास जाण्यासाठी आपली साथही हवी आहे. कोरोनाच्या संकटामुळे मंदावलेली विकासाची गती आपल्याला पुन्हा गाठायची आहे. त्यासाठी कितीही आव्हाने येऊ देत, त्यांची तमा करायची नाही, असे धैर्य बाळगूया.