धर्मांतरविरोधी कायदा करणे आणि गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवणे, यांविषयी बैठक आयोजित करू ! – मुख्यमंत्री

मुंबई, २३ ऑगस्ट (वार्ता.) – महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा करण्याविषयी, तसेच गड-किल्ले यांवरील अतिक्रमण काढून त्यांचे संवर्धन करण्याविषयी विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन झाल्यावर बैठक आयोजित करून निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, तसेच गड-दुर्ग यांचे संवर्धन करावे या मागण्यांसाठी समितीच्या शिष्टमंडळाने २२ ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या विषयांची निवेदने दिली.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते. या प्रसंगी शिवसेनेचे विधानसभेचे पक्षप्रतोद (विधीमंडळात स्वपक्षाच्या आमदारांच्या संदर्भात निर्णयांचा अधिकार असणारे) श्री. भरतशेठ गोगावले, तसेच भाजपचे माजी आमदार श्री. बाळासाहेब मुरकुटे हेही उपस्थित होते. त्यांनी या महत्त्वाच्या विषयांमध्ये लक्ष घालण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. या वेळी विशाळगडावरील अतिक्रमण हटवणे, तसेच सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या गडांचे संवर्धन करणे, या मागण्याही समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या. याविषयीचे निवेदनही या वेळी समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.