भारताची स्वातंत्र्यापासून झालेली आर्थिक प्रगती महासत्तेच्या दिशेने !

भारत स्वतंत्र झाल्यावर ‘तो टिकेल का ?’, इथपासून ते ‘भारत महासत्ता बनणार का ?’, इथपर्यंतचा प्रवास देशाने साधला आहे. वर्ष १९४८ मध्ये म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे भविष्य डळमळीत होते, याविषयी काही जणांच्या आठवणी असतील. त्या वेळी ‘भारत राष्ट्र म्हणून टिकेल का ?’, असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात होता; परंतु आता भारताच्या ७५ वर्षांच्या वाटचालीनंतर आता ‘भारत महासत्ता बनणार का ?’, असा प्रश्न विचारला जात आहे. भारतातील लोकशाहीच्या असामान्य लवचिकतेमुळे विचारसरणीमध्ये अशा प्रकारे पालट झाला आहे. गेल्या काही वर्षांत भारताने शिक्षण, आर्थिक, संरक्षण, माहिती-तंत्रज्ञान आणि विज्ञान इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रमाणात प्रगती केली आहे. भारताने प्रगती करतांना विविध क्षेत्रात केलेली प्रगती आणि त्यातील महत्त्वाचे टप्पे येथे दिले आहेत.

१. आर्थिक प्रगती

वर्ष २०१५ मध्ये जगात जलद गतीने आर्थिक विकास साधणारा देश ठरला. या वेळी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) दर ५ टक्के होता. भारताचा जीडीपी ३ कोटी लाख डॉलर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक या आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताच्या वार्षिक आर्थिक विकासाची प्रशंसा केली. भरभक्कम जीडीपी, आंतरराष्ट्रीय स्तरावर सैनिकी (लष्करी) युती असलेला; राजकीय, आर्थिक प्रभाव आणि नेतृत्व कौशल्य असलेल्या अशा देशांच्या सूचीत भारताचे स्थान १३ वे आहे. वर्ष २०५० मध्ये भारताची क्रयशक्ती समानता सिद्धांत (पर्चेसिंग पॉवर पेरिटी (पी.पी.पी.)) ४३ कोटी लाख डॉलर होणे अपेक्षित आहे ज्यामुळे भारत अमेरिकेच्या पुढे जाईल. वर्ष २०४० पर्यंत भारत क्रयशक्ती समानता सिद्धांतामध्ये अमेरिकेच्या पुढे जाऊन जगातील दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल.

२. संरक्षण क्षेत्रातील प्रगती

५४ अब्ज डॉलर सरंक्षणविषयक आर्थिक तरतूद असलेला आणि १३ लाख ६२ सहस्र ५०० सैनिक बळ असलेला भारत जगातील १० बलवान सैन्य असलेल्या देशांच्या सूचीत ४ थ्या क्रमांकावर आहे. भारताकडे सध्या २ सहस्र १०२ विमानांचा ताफा आहे, तसेच नौदलाकडे २९५ युद्धनौका आहेत आणि लष्करी आणीबाणी हाताळण्याची क्षमता आहे. भारत सर्व जगातून नवीन तंत्रज्ञान आणि संकल्पना घेत आहे. आपल्याकडे रशियाकडून घेण्यात आलेली ५ व्या आवृत्तीची (फिफ्त जनरेशन) लढाऊ विमाने आहेत. याचसमवेत भारताने अमेरिका आणि इस्रायल यांच्याकडून संरक्षणासाठीचे ड्रोन तंत्रज्ञान घेतले आहे. पुढील ३ दशकांमध्ये जर भारताने संरक्षण खर्चात म्हणजे विशेषतः हवाई दल, सायबर आणि नवीन तंत्रज्ञान यांमध्ये वाढ केली, तर देश कोणतीही कठीण किंवा गंभीर परिस्थिती हाताळू शकेल.

३. कारखाने आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांत होत असलेली भरभराट

जागतिक विकासातील प्रमुख देश म्हणून अजूनही आर्थिक क्षेत्रात चीनचा प्रभाव आहे; परंतु त्यामध्ये पुढील महासत्ता म्हणून भारत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. वर्ष २०२१-२०२२ मध्ये ८४ सहस्र ८३५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक (एफ्.डी.आय.) भारतात झाली आहे. व्यवसायाच्या दृष्टीने भारतात योग्य प्रदेश आणि व्यवसायाला साहाय्यभूत ठरणारे सरकारचे धोरण यांमुळे देशात व्यवसाय करणे सोपे झाले आहे. वसुलीला उत्तेजन देणार्‍या योजना आणि विदेशी गुंतवणुकीला चालना देणारे उपक्रम यांमुळे गुंतवणूकदारांचा भारताविषयीचा विश्वास वाढला आहे. भारत सरकारने ‘स्मार्ट सिटी’, ‘मेक इन इंडिया’ यांसारख्या प्रकल्पातून या क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.

४. वर्ष २०५० पर्यंत भारत महासत्ता बनेल !

भारतातील अनेक शहरे आणि जिल्हे यांमध्ये जरी चांगल्या पद्धतीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही, तरी देश आधुनिक जलद वाहतूक व्यवस्था सिद्ध करण्याच्या प्रक्रियेत आहे. देशातील देहली, कोलकोता, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई आणि कोची या शहरांमध्ये आधुनिक अशी मेट्रो रेल्वे आहे. बुलेट ट्रेन आणि इतर काही महत्त्वाकांक्षी योजना यांमुळे देशाची आर्थिक प्रगती होऊन वर्ष २०५० पर्यंत भारत महासत्ता बनेल.

(साभार : साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’)