‘लव्ह जिहाद’पासून वाचण्यासाठी सतर्क रहा ! – मंजुषा खाडये, हिंदु जनजागृती समिती

कणकवली येथे श्री श्री वामनाश्रम स्वामी यांच्या उपस्थितीत चातुर्मास सोहळ्यात मार्गदर्शन

कणकवली – आपल्या भोळेपणाचा अपलाभ उठवून धर्मांध आपल्याला फसवण्यासाठी टपलेले आहेत. हिंदु महिला आणि युवती यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे पद्धतशीर प्रशिक्षण या धर्मांधांना दिले जाते. ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या युवतींना अनेक यातना भोगाव्या लागतात. हिंदु नावे धारण करून धर्मांध मुसलमान हिंदु युवतींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, हे लक्षात घेऊन हिंदु युवती आणि महिला यांनी सतर्क रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मंजुषा खाडये यांनी येथे केले.

कणकवली येथे वैश्य समाजाचे गुरु तथा हळदीपूर येथील श्री संस्थान शांताश्रमचे मठाधिपती श्री श्री वामनाश्रम स्वामी यांच्या उपस्थितीत चातुर्मास सोहळा चालू आहे. या सोहळ्यात राष्ट्र आणि धर्म यांच्या अनुषंगाने विषय मांडण्यास श्री श्री वामनाश्रम स्वामी यांनी हिंदु जनजागृती समितीला अनुमती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर २१ ऑगस्ट या दिवशी येथे आयोजित ‘युवती मेळाव्या’त सौ. खाडये बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, ‘‘आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व जाणून घेऊन त्याचे पालन केले पाहिजे. कुंकू लावणे, योग्य पोषाख परिधान करणे, अशा छोट्या कृतींमधून आपला धर्म आणि संस्कृती यांचे पालन केले पाहिजे. धर्मपालन करून आपण क्षात्रतेज वाढवूया म्हणजे कुणाला आपल्याकडे वाकड्या नजरेने पहाण्याचे धाडस होणार नाही.’’

या वेळी सौ. खाडये यांनी ‘लव्ह जिहाद’ची दाहकता स्पष्ट करणारा ग्रंथ उपस्थितांना दाखवून त्याचे महत्त्व विशद केले.
या वेळी कार्यक्रमस्थळी सनातनचे ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांचा कक्ष उभारण्यात आला होता. या कक्षाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

क्षणचित्र

श्री श्री वामनाश्रम स्वामी यांनी स्वसंरक्षणाचे महत्त्व उपस्थितांवर बिंबवणे

या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. अदिती तवटे आणि कु. भक्ती पांगम यांनी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. ही प्रात्यक्षिके पाहून श्री श्री वामनाश्रम स्वामी यांनी ती पुन्हा एकदा सादर करण्यास सांगितली. श्री श्री वामनाश्रम स्वामी यांनी अशा प्रकारे स्वसंरक्षणाचे महत्त्व उपस्थितांवर बिंबवले.

अभिप्राय

१. श्री. दीपक अंधारी, अध्यक्ष, वैश्य गुरु चातुर्मास सेवा समिती, सिंधुदुर्ग – स्वसंरक्षण प्रात्यक्षिके उत्तम प्रकारे सादर केली गेली.

२. श्री. जीवन बांदेकर, माजी नगरसेवक, कुडाळ – विषय उत्तमरित्या मांडला. धर्मांध मुसलमान नावे पालटून हिंदु नावे धारण करून मुलींना जाळ्यात अडकवतात आणि त्यामुळे मुली फसतात, हे आपण सांगायला हवे.

३. सौ. नीलम धडाम, कणकवली – चांगले मार्गदर्शन केले. हा विषय महत्त्वपूर्ण आहे. चातुर्मास संपल्यानंतरही आपण एकत्र येऊया आणि असे विषय मांडत राहूया.