‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ची सेवा करतांना तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील साधकांना समाजातून मिळालेला चांगला प्रतिसाद पाहून अनुभवला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संकल्प !

सौ. विनुता शेट्टी, भाग्यनगर, तेलंगाणा.

१. विजयवाडा येथे आश्चर्यकारकरित्या झालेले ग्रंथवितरण !

१ अ. विजयवाडा येथील पुस्तक मेळाव्यात नेहमी सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण अधिक होत असणे : ‘विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे पुस्तक मेळावा होता. त्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन लावले होते. विजयवाड्यातील लोकांमध्ये ग्रंथवाचनाची आवड अल्प आहे. त्यामुळे नेहमी तिथे ग्रंथांपेक्षा सात्त्विक उत्पादनांचे वितरण अधिक होते. या वेळच्या मेळाव्यातही आरंभी ७ दिवस उत्पादनांचीच विक्री अधिक होत होती.

१ आ. अकस्मात् आणि आश्चर्यकारकपणे ग्रंथांचे वितरण वाढणे : नंतर अकस्मात् ग्रंथांचे वितरण चांगले होऊ लागले. प्रत्येक वर्षीच्या तुलनेत या वेळी काहीतरी वेगळेच घडत होते. त्याविषयीची माहिती येथे देत आहे.

१. एका मोठ्या वितरण कक्षाच्या व्यक्तीने तिच्या दुकानात सनातनचे ग्रंथ ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.
२. एका दुग्धालयाचा मालक म्हणाला, ‘‘माझ्या गावात धर्मांतर होत आहे. ते रोखण्यासाठी मला तुमचे ग्रंथ पाहिजेत.’’
३. मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी एक व्यक्ती येऊन म्हणाली, ‘‘तुमच्या वितरण कक्षावर जेवढ्या प्रकारचे ग्रंथ आहेत, त्या सर्व प्रकारचे एकेक ग्रंथ मला द्या. तुम्ही ग्रंथ सिद्ध ठेवा.’’
४. मेळावा पार पडल्यानंतर एका आश्रमातून आम्हाला भ्रमणभाष आला, ‘आम्हाला तुमचा ‘धर्मशिक्षण फलक’ ग्रंथ पुष्कळ चांगला वाटला. आम्हाला त्याच्या अजून काही प्रती पाहिजेत.’

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प कार्यरत असल्याची अनुभूती येणे : या वेळी अशा पुष्कळ आश्चर्यकारक घटना घडल्या. ‘हे सर्व केवळ गुरुदेवांच्या संकल्पामुळे झाले’, असे आम्हाला वाटत होते. आम्ही काही विशेष प्रयत्न केले नव्हते. ‘काय होत आहे ?’, हे आम्ही केवळ पहात होतो. ‘तिथे कुणीतरी आहे आणि ती सर्वकाही करत आहे. आम्ही केवळ पहात आहोत’, असेच आम्हाला वाटत होते. ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’त आम्हाला माध्यम बनवून सेवा करवून घेतली, यासाठी गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ पुष्कळ कृतज्ञता !’

सौ. सविता कणसे, विशाखापट्टणम्, आंध्रप्रदेश.

१. ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ची प्रसारसेवा चालू करण्यापूर्वी मनात असलेला बुद्धीचा अडथळा

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ची सेवा चालू करण्याच्या वेळी माझ्या मनात आले, ‘आता आपण दुसर्‍या गावात स्थलांतरित झालो आहोत. येथे कसा प्रतिसाद मिळेल ? लोक ग्रंथ घेतील कि नाही ?’ मला बुद्धीचे बरेच अडथळे येत होते. आरंभीचे ४ दिवस माझ्याकडून सेवा करायला टाळाटाळही होत होती.

२. गुरुदेवांना प्रार्थना करून सेवा चालू केल्यावर समाजातून सकारात्मक प्रतिसाद मिळणे, तेव्हा ‘गुरुदेवच प्रसार करवून घेत आहेत’, असे जाणवणे

मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) शरणागतीने प्रार्थना केली, ‘आपणच ही सेवा माझ्याकडून करवून घ्यावी.’ त्यानंतर ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या, त्या सर्वांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिला. काही लोकांनी ग्रंथांचे संचही घेतले. तेव्हा आम्ही सेवा करत नव्हतो, तर सर्व आपोआप घडत होते. ‘भगवंताने या सेवेसाठी मला माध्यम बनवले आहे’, हे मला अनुभवता आले. ‘ही सर्व सेवा गुरुदेवांनीच करवून घेतली’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

एक साधक, भाग्यनगर, तेलंगणा.

मंदिराच्या विश्वस्तांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना ‘सनातन संस्थेचे ग्रंथ पुष्कळ चांगले असून मंदिराच्या वतीने ग्रंथ घेऊन ते वाटणार आहोत’, असे सांगणे : ‘नवरात्रीनिमित्त एका मंदिरात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या मंदिराचे पुजारी धर्मशिक्षणवर्गात सहभागी होतात. त्यांनी आम्हाला मंदिरात विषय मांडायला बोलावले होते. तेव्हा ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला आरंभ झाला होता; मात्र मंदिरात विषय मांडतांना आम्ही ग्रंथांविषयी काहीच सांगितले नव्हते. मंदिराच्या विश्वस्तांनी कार्यक्रमाच्या शेवटी सांगितले, ‘‘आज या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या ग्रंथांचा वितरण कक्ष लावला आहे. त्यांचे ग्रंथ पुष्कळ चांगले आहेत. आम्ही मंदिराच्या वतीने अनेक ग्रंथ घेऊन ते भक्तांना वाटणार आहोत.’’

या प्रसंगावरून गुरुदेवांचा ‘ज्ञानशक्ती अभियाना’चा संकल्प कसा कार्यरत आहे ?’, ते आम्हाला अनुभवता आले.’

सौ. अलका मिठारे, विशाखापट्टणम्, आंध्रप्रदेश.

सेवा करतांना ‘आपण केवळ माध्यम आहोत’, असा भाव ठेवणे : ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या माध्यमातून ‘गुरुदेवांचे ज्ञान समाजापर्यंत पोचावे’, यासाठी त्यांचा संकल्प झाला आहे. सेवा करतांना भगवंताने ‘आम्ही केवळ माध्यम आहोत’, असा भाव ठेवण्यास शिकवले. दुकानात येणारे लोक, सत्संगात येणारे जिज्ञासू आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचे वाचक यांना ग्रंथ घेण्याविषयी विचारल्यावर त्यांच्याकडून त्वरित प्रतिसाद मिळाला आणि तेलुगु ग्रंथांचे चांगल्या प्रमाणात वितरण झाले. ‘हे सर्व गुरुदेवांच्या संकल्पामुळे शक्य झाले’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली.’

(फेब्रुवारी २०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक