जगभरातील देश, संयुक्त राष्ट्र आणि भारत यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा ! – पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष, अध्यक्ष, ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचाराविषयी सरकार गप्प का ?’

संपादकीय भूमिका 

बांगलादेशी हिंदूंवर अत्याचार होत असतांना कथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी काही बोलणार का ?

पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष

मुंबई – सध्या बांगलादेशात सहस्रोंच्या संख्येने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुसलमानांकडून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. कुराण अथवा महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याचा खोटा आरोप करून हिंदूंची मंदिरे तोडणे, देवतांच्या मूर्ती फोडणे, हिंदूंच्या वस्त्या जाळणे, हिंदूंच्या हत्या करणे, तसेच महिला-मुलींवर बलात्कार केले जात आहेत. हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. बांगलादेश सरकार आणि पोलीस हिंदूंच्या रक्षणासाठी काहीही करत नाहीत. त्यामुळे हिंदू आता बांगलादेशात सुरक्षितपणे राहू शकत नाहीत.

हिंदूंच्या रक्षणासाठी तेथे कुणी नाही. हे असेच चालू राहिले, तर पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होऊन बांगलादेशात हिंदू शेष रहाणार नाहीत. त्यामुळे जगभरातील देश, संयुक्त राष्ट्र आणि भारत यांनी या विषयात लक्ष घालून हिंदूंच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन हिंदूंच्या मानवाधिकारासाठी लढा देणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचाराविषयी सरकार गप्प का ?’, या विषयावरील ऑनलाईन ‘विशेष संवादा’त ते बोलत होते.


‘मानवाधिकार संघटना’ आणि ‘संयुक्त राष्ट्र’ यांना जाब विचारला पाहिजे ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. शंभू गवारे

भारतात कुठेही मुसलमानांवर जरा काही अत्याचार झाले, तर जगभरातील ५७ इस्लामी देश एकत्र येऊन त्या विरोधात आवाज उठवतात. ‘संयुक्त राष्ट्र’ आणि ‘युरोपीय युनियन’, हेही त्यांच्या बाजूने बोलतात; मग ३० वर्षांपासून चालेला काश्मिरी हिंदूंचा नरसंहार आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार यांविषयी ते का बोलत नाहीत ? फाळणीनंतर पाक आणि बांगलादेशात रहात असलेल्या हिंदूंचा वंशसंहार केला जात आहे, तर भारतात राहिलेल्या धर्मांधांची लोकसंख्या प्रतिदिन वाढत असून ते देशद्रोही आणि हिंदुद्वेषी कारवाया करत आहेत, हा भेद निधर्मीवादी अन् पुरो(अधो)गामी कधी लक्षात घेणार ? त्यामुळे आता समस्त हिंदूंनी आता एकत्र आले पाहिजे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात ‘नेदरलँड्स’चे खासदार गीर्ट विल्डर्स यांनी १३ प्रश्न विचारून जगभर आवाज उठवला, तसे भारतातील बांगलादेशी दूतावासाच्या बाहेर हिंदूंनी निदर्शने करून त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे, तसेच तेथील ‘मानवाधिकार संघटना’ आणि ‘संयुक्त राष्ट्र’ यांना जाब विचारला पाहिजे.


बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे एक नियोजनबद्ध षड्यंत्र ! – प्रा. चंदन सरकार, अध्यक्ष, ‘रिसर्च अँड एम्पॉवरमेंट ऑर्गनायजेशन’, बांगलादेश

प्रा. चंदन सरकार

वर्ष २०१२ ते २०२२ या कालावधीमध्ये बांगलादेशामध्ये नियोजनबद्धरित्या हिंदूंच्या वस्त्यांवर आक्रमणे करून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे, जेणेकरून हिंदूंनी बांगलादेश सोडून पलायन करावे. त्यामुळे तेथील हिंदूंची लोकसंख्या सातत्याने घटत आहे. पूर्वी २८ टक्के असणारी हिंदूंची संख्या आता ६ टक्के राहिली आहे.


संपूर्ण जग आणि भारत हिंदूंवरील अत्याचार शांतपणे पहात आहे ! – दीपेन मित्रा, प्रधान सचिव, ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’, बांगलादेश

श्री. दीपेन मित्रा

गेल्या काही मासांत बांगलादेशात ३२५ हून अधिक हिंदूंची मंदिरे आणि दुर्गापूजेचे मंडप यांची तोडफोड करण्यात आली. हिंदूंच्या हत्या करून महिलांना पळवले जात आहे. हिंदूंना कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत; मात्र संपूर्ण जग आणि शेजारील देश भारत शांतपणे हे पहात आहे. हिंदूंचा छळ थांबवण्यासाठी आम्हाला साहाय्य हवे आहे.