केंद्रीय यंत्रणेकडून ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना सावध रहाण्याची चेतावणी !

नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याचे प्रकरण

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद दवे

पुणे – भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानावरून देशभरात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावरून पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केंद्रीय यंत्रणेकडून सावध रहाण्याची चेतावणी देण्यात आली आहे. नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्‍या उदयपूर येथील कन्हैय्यालाल यांची हत्या करण्यात आली, तर अमरावतीतही उमेश कोल्हे यांची हत्या झाली आहे. ही हत्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ केलेल्या ‘पोस्ट’मुळे झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणेने दवे यांना सावध रहाण्याचा सल्ला दिला आहे. याविषयी दवे ४ जुलै या दिवशी पोलिसांच्या विशेष शाखेकडे पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहेत.

देव, देश आणि धर्म यांसाठीच हे जीवन आहे ! – आनंद दवे

याविषयी आनंद दवे म्हणाले की, मुसलमान मूलतत्त्ववादी संघटनांच्या रडारवर माझे नाव असल्याचे केंद्रीय यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून मला महासंघाच्या कार्यालयात येऊन सांगण्यात आले. हे सर्व करत असतांना नियतीने सोपवलेले कार्य मात्र एक क्षणभरसुद्धा थांबणार नाही, हे निश्चित ! देव, देश आणि धर्म यांसाठीच माझे जीवन आहे.

संपादकीय भूमिका

बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदुत्वनिष्ठांना सावध रहाण्याची वेळ येणे, हे पोलिसांपेक्षा आतंकवाद्यांदी अधिक वरचढ असल्याचे लक्षणआहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रात ही वेळ येणे हे राज्यासाठी दुर्दैवी !