कमलेश तिवारी यांच्या मारेकर्‍यांना तात्काळ फाशी द्या, अन्यथा मी आत्मदहन करीन !

  • तिवारी यांच्या पत्नीची उत्तरप्रदेश सरकारला चेतावणी

  • तीन वर्षांपूर्वी हत्या झालेले हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी यांचे कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत !

हत्या झालेले हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथे १८ ऑक्टोबर २०१९ या दिवशी हिंदुत्वनिष्ठ नेते कमलेश तिवारी यांची मुसलमानांनी नृशंस हत्या केली होती. उदयपूर हत्याकांडानंतर आता तिवारी यांच्या पत्नी किरण तिवारी यांनी त्यांच्या पतीच्या मारेकर्‍यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ‘तसे केले नाही, तर आत्मदहन करीन’, अशी चेतावणीही त्यांनी उत्तरप्रदेश सरकारला दिली आहे.

उत्तरप्रदेश सरकारवर ओढले ताशेरे !

किरण तिवारी

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत किरण तिवारी म्हणाल्या की,

१. माझ्या पतीच्या हत्येला ३ वर्षे होऊनही मुख्य सूत्रधार तन्वीर अजूनही पकडला गेलेला नाही. दुसरीकडे १३ पैकी ५ आरोपींना जामीन मिळाला असून त्यांच्यापासून आमच्या जीविताला धोका आहे. आम्ही भयाच्या सावटाखाली जगत आहोत.

२. सरकार ‘आमची हत्या व्हावी’, या प्रतीक्षेत आहे  का? जेणेकरून त्यांना राजकारण करता येईल ?

३. आम्हाला एक सुरक्षारक्षक देण्यात आला आहे. जर आमच्यावर कुणी आक्रमण करायला आले, तर तो आमचे रक्षण करील कि स्वत:चे ?

४. माझे पती श्रीराममंदिराचे पक्षकार होते. ते १५ वेळा कारागृहात जाऊन आले आहेत. त्यांनी अनेक वेळा पोलिसांचा लाठीमार झेलला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत न्यायालयीन खटला चालला. त्या वेळीही ते ११ मास कारागृहात होते. हिंदूंसाठी लढणार्‍या माझ्या पतीसाठी अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन यांनी न्यायालयीन प्रकरण लढले होते.

रोहिंग्या मुसलमानांपासून आमच्या जीविताला धोका !

किरण तिवारी पुढे म्हणाल्या की, गरीबी रेषेच्या खाली असलेल्या लोकांसाठी जसा असतो, तसा सरकारी निवास आम्हाला मिळाला आहे. त्या ठिकाणी चारही बाजूंना रोहिंग्या मुसलमान रहात आहेत. आम्ही त्या घरात पाऊलही ठेवलेले नाही. मी माझ्या मुलांसह रस्त्यावरही राहिले, तरीही आमचे रक्षण होऊ शकेल. आम्ही सरकारी निवासात रहायला गेलो, तर आमची निश्‍चितपणे हत्या होईल.

किरण तिवारी यांनी केलेल्या मागण्या !

१. माझ्या पतीची हत्या करणारे अशफाक आणि मोइनुद्दीन यांना तात्काळ फाशी व्हायला हवी. पुढील १५ दिवसांत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करीन.

२. माझ्या मुलाला सरकारी नोकरी मिळावी. माझा मुलगा कायदा पदवीचा अभ्यास करत आहे; परंतु त्याच्या नोकरीची धारिका (फाईल) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे अजूनही पोचलेली नाही.

३. सरकारकडून आम्हाला १५ लाख रुपये मिळाले आहेत. त्या रकमेवर जगणे कठीण आहे. ५० लाख रुपये मिळण्याची आमची मागणी सरकारने पूर्ण करावी.

४. माझ्या पतीच्या हत्येनंतर हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवण्यात यावे, अशी मागणी आम्ही तत्कालीन कायदामंत्री बृजेश पाठक यांच्याकडे केली होती. तेव्हा आश्‍वासन देण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. आम्ही न्यायाची भीक मागण्यासाठी कुणाकडे जावे ? किमान न्यायालय आणि सरकार यांनी तरी आम्हाला न्याय द्यावा !

योगी आदित्यनाथ यांनी आम्हाला न्याय द्यावा !

किरण तिवारी म्हणाल्या, ‘‘योगी आदित्यनाथ एक संत आहेत. आम्ही संतांना ‘ईश्‍वर’ मानतो. सरकारने आम्हाला न्याय द्यावा आणि आमच्या कुटुंबाला दिलेले वचन पूर्ण करावे, असे मी त्यांना आवाहन करते.’’

संपादकीय भूमिका

आरोपींना तात्काळ शिक्षा होण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून ठोस प्रयत्न होत नसल्यानेच हिंदूंना अशी चेतावणी द्यावी लागते. हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! सरकार आता तरी हत्या झालेल्या सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या मारेकर्‍यांना तात्काळ शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करील का ?