हिंदुविरोधी घटनांना उत्तर देण्यासाठी हिंदूंना ‘कट्टर हिंदू’ व्हावे लागेल ! – डॉ. (सुश्री) वैदेही ताम्हण, संपादिका, ‘आफ्टरनून वॉईस’, मुंबई

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदूंच्या सुरक्षेविषयी विचारमंथन !

डॉ. (सुश्री) वैदेही ताम्हण

रामनाथी (गोवा), १४ जून (वार्ता.) – मी हिंदू आहे, याचा मला अभिमान आहे. सद्यःस्थितीत विरोधकांकडून हिंदूंच्या संस्कृतीवर वैचारिक आणि शैक्षणिक स्तरांवर आक्रमण केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ‘हिंदू आतंकवादी आहेत’, तर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी, ‘जो भगवा घालतो, तो आतंकवादी आहे’, असे वक्तव्य केले होते. ‘बहुसंख्य असूनही अशा गोष्टींना हिंदू विरोध का करत नाहीत ?’, याचेही चिंतन केले पाहिजे. अशा प्रकारांना उत्तर देण्यासाठी आपल्याला कट्टर हिंदू बनावे लागेल. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी सामाजिक व्यासपिठावर बोलण्यावर त्यांच्या पक्षाने बंदी घातली. ज्या सरकारला हिंदूंनी पूर्ण बहुमताने निवडून दिले, त्या सरकारने असा आदेश काढणे, हे दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील ‘आफ्टरनून वॉईस’ या वृत्तपत्राच्या संपादिका डॉ. (सुश्री) वैदेही ताम्हण यांनी केले.

रामनाथी (गोवा) येथे चालू असलेल्या दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या दुसर्‍या उद्बोधन सत्रात १४ जून या दिवशी ‘हिंदूंची सुरक्षा’ या विषयावर राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य तथा हरियाणा येथील भाजप महिला मोर्चाच्या राज्य प्रभारी श्रीमती नंदा डगला, ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे संरक्षक पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते तथा लेखक श्री. दुर्गेश परूळेकर यांनी विचार मांडले. या वेळी डॉ. (सुश्री) वैदेही ताम्हण यांनी ‘हिंदूंवर करण्यात येणार्‍या छुप्या आक्रमणाला कसे ओळखावे ?’, या विषयावर उपस्थितांचे उद्बोधन केले.

हिंदु धर्मावरील आघातांविषयी लिखाण प्रसिद्ध करण्याचे धाडस माझ्यात आहे ! – डॉ. (सुश्री) वैदेही ताम्हण

लेखणीत भरपूर शक्ती असते. हिंदूंनी सातत्याने हिंदु धर्म आणि त्यांवर होणारे आघात यांसाठी ‘फेसबूक’, तसेच विविध प्रसारमाध्यमांद्वारे व्यक्त व्हायला हवे. तुमच्या लेखणीत लिहिण्याचे धाडस असेल, तर एका वृत्तपत्राची संपादिका या नात्याने ते लिखाण प्रसिद्ध करण्याचे धाडस माझ्यात आहे.

हिंदु राष्ट्राच्या कार्यात महिलांचे योगदान मोठे असेल ! – श्रीमती नंदा डगला, राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य तथा राज्य प्रभारी, भाजप महिला मोर्चा, हरियाणा

श्रीमती नंदा डगला

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत महिलांचा सहभाग’ या विषयावर बोलतांना श्रीमती नंदा डगला म्हणाल्या, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जिजाबाई यांनी संस्कार केले. त्यांनीच हिंदु साम्राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज दिले. पती लढाईला जाण्यापूर्वी पत्नी पतीला टिळा लावून ‘लढाईत विजयी होऊन या’, असे सांगत असे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या कार्यात महिलांचे योगदान मोठे असेल. महिलांखेरीज हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकणार नाही.’’ राजस्थान येथील सनातन संस्थेच्या साधिका डॉ. स्वाती मोदी यांनी श्रीमती नंदा डगला यांचा सत्कार केला.

श्रीमती नंदा डगला पुढे म्हणाल्या की,

१. भारतात पूर्वीपासून प्रत्येक कार्यात स्त्रियांचे योगदान मोठे आहे. सभ्यता, संस्कृती आणि हिंदुत्व या दृष्टीने स्त्रियांचे महत्त्व मोठे आहे. एकीकडे महिलांना शिकण्याचा अधिकार नाही, अशी गरळओक केली जाते; मात्र वैदिक काळापासून स्त्रिया शिक्षण घेत आहेत, तसेच त्यांची पूजाही केली जाते. तसेच आंदोलनातही महिलांचे योगदान मोठे आहे. परंपरा, वेशभूषा, एकता, सभ्यता महिलांमध्ये दिसून येतात.

२. धर्माच्या आधारावर देशाचे तुकडे झाले आहेत. तरीही देशात अन्य पंथियांचे लोक मोठ्या संख्येने रहातात; मात्र अन्य पंथियांचे लोक हिंदु कुटुंबात आणि त्यांच्या घरात हस्तक्षेप करत असतील, तर त्यांना ‘जशास तसे’ उत्तर दिले पाहिजे.

३. आम्ही भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांच्या पाठीशी आहोत. त्यांना अटक केल्यास अनेक महिला स्वतःहून अटक करून घेतील. नुपूर शर्मा म्हणजे ‘एक नारी सब पे भारी’ आहे. हिंदुद्वेषी दिवंगत एम्.एफ्. हुसेन हिंदु देवतांचे विडंबन करून तो परदेशात पळून गेला. त्या वेळी त्यांनी क्षमा मागण्याची मागणी कुणी नाही; मात्र नुपूर शर्मा यांना क्षमा मागायला सांगितली जाते, हे चुकीचे आहे.

‘हिंदु राष्ट्रवाद’ हेच धर्मनिरपेक्षतेचे दुसरे नाव आहे ! – दुर्गेश परूळेकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते तथा लेखक, ठाणे, महाराष्ट्र

श्री. दुर्गेश परूळेकर

‘धर्मनिरपेक्षता या शब्दाला विरोध करा !’, या विषयावर श्री. दुर्गेश परूळेकर म्हणाले की, देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत नरसिंह राव यांनी वर्ष १९९२ मध्ये एका भाषणात सांगितले की, कोणता राजकीय पक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि कोणता नाही, हे निश्चित करण्याचे कोणतेही प्रमाण नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचा निर्णय योग्य तर्‍हेने घेता येत नाही. यानंतरही ‘धर्मनिरपेक्षता’ या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न कोणत्याही साम्यवाद्यांनी केला नाही. आज विश्वात हिंदु राष्ट्रवादावर चर्चा केली जाते. मुळात ‘हिंदु राष्ट्रवाद’ हेच धर्मनिरपेक्षतेचे दुसरे नाव आहे. राष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे स्वप्न पहाणारा राष्ट्रवाद समर्थनीय आहे. त्यामुळे राष्ट्रवादाला आजारी समजून त्यासाठी औषध शोधण्याचा प्रयत्न करणे, हा मूर्खपणा आहे. असे असतांनाही राष्ट्रवादाला विरोध केला जात आहे. विश्वात उदारमतवाद, समाजवाद आणि निधर्मीवाद विचारप्रणाली आज फॅशन झाली आहे. राष्ट्रवादाच्या प्रेरणाला दाबणे म्हणजे अनेक संकटांना आमंत्रित करण्यासारखे आहे.

विश्वात ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादा’चा स्वीकार करणे निषिद्ध मानण्यात आले आहे ! – दुर्गेश परूळेकर

२२ जुलै १९९४ मधील ‘इंडिपेंडेंट’ वार्तापत्रातील एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यातील एका परिच्छेदात म्हटले होते की, ‘टांझानिया फॉर टांझानियन्स ओन्ली (टांझानिया टांझानियांच्या नागरिकांसाठी आहे).’ ही घोषणा आता टांझानिया येथे पसरू लागली आहे. ‘हिंदुस्थान हिंदूंचे आहे’, या घोषणेवर आकांडतांडव करणार्‍यांनी या वेळी मौन व्रत धारण केले होते. यातून लक्षात येते की, विश्वात धर्मनिरपेक्षता राष्ट्रवादाचा स्वीकार करणे निषिद्ध मानण्यात आले आहे.