भारतात हिंदु राष्ट्र स्थापित झाल्यावरच विश्वात शांतता आणि बंधुभाव निर्माण होईल ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

मुंबई – भारतातील ‘सनातन वैदिक हिंदु धर्मा’त अशी शक्ती आणि नेतृत्व आहे की, ज्यामुळे विश्वात शांतता, बंधुभाव निर्माण होऊ शकतो. तशी शक्ती अन्य पंथांकडे नाही. त्यामुळे एकदा का भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना झाली की, विश्वभरातील शत्रुत्वाची भावना नष्ट होऊन शांतता प्रस्थापित होणार आहे.

ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

विस्तारवादासाठी अन्य देशांवर आक्रमणे होणार नाहीत. ‘स्वत: जगा आणि इतरांना जगू द्या’, या सिद्धांतावर जग चालेल. त्यामुळे समस्त हिंदूंनी संघटित होऊन भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन लष्कर-ए-हिंद’चे संस्थापक अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडलेवाल यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

श्री. गंगाधर कुलकर्णी, कार्याध्यक्ष, श्रीराम सेना

हिंदुहितासाठी ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव उपाय ! – गंगाधर कुलकर्णी, कार्याध्यक्ष, श्रीराम सेना

स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी धर्माच्या आधारे फाळणी होऊन पाकिस्तान हा इस्लामी देश बनला; पण भारत हिंदु राष्ट्र झाला नाही. आज ‘सेक्युलॅरिझम’च्या (निधर्मीपणाच्या) नावाखाली हिंदूंना दडपले जात आहे. आतंकवाद, लव्ह जिहाद, गोहत्या, मंदिरांची तोडफोड, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या आदी संकटांनी डोके वर काढले आहे. या सगळ्या समस्यांवर ‘हिंदु राष्ट्र’ हेच एकमेव उत्तर आहे. हिंदु राष्ट्रातच खऱ्या अर्थाने हिंदु सुरक्षित आणि समाधानाने जगू शकतील. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत साध्य न झालेले हिंदुहित साध्य करण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे. जसा ‘सेक्युलर’ हा शब्द घटनेत समाविष्ट करण्यात आला, तसा ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्दही समाविष्ट करता येऊ शकतो; मात्र त्यासाठी प्रभावी हिंदूसंघटनाची आवश्यकता आहे.


हे पहा –

हिन्दू जनजागृति समिति आयोजित

🔊 विशेष संवाद

🚩 चर्चा हिन्दू राष्ट्र की…

🚩 हिन्दुओं को क्यों चाहिए – हिन्दू राष्ट्र ?

__________________________________________ 

श्री. वैभव आफळे

हिंदु राष्ट्रात गुरुकुलाप्रमाणे भौतिक विद्येसह आध्यात्मिक आणि नैतिक शिक्षण दिले जाईल ! – वैभव आफळे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

आजची व्यवस्था निधर्मी आहे. त्यामुळे आतंकवाद, नक्षलवाद आदी अनेक समस्यांवर प्रभावी उपाय काढता आलेलेच नाहीत. आतंकवादी वा नक्षलवादी यांना पकडले, तरी त्यांच्यावर लगेच खटले चालत नाहीत. खटले चालले, तरी त्यांना शिक्षा होत नाही. जरी शिक्षा मिळाली, तरी त्याची कार्यवाही होणे दूरच असते; मात्र हिंदु राष्ट्रात जलद न्यायप्रणालीमुळे तात्काळ खटला चालवून लगेच शिक्षा देऊन कार्यवाही केली जाईल. त्यामुळे पुढे कुणी असे अपकृत्य करण्यापूर्वी १० वेळा विचार करील. सध्या ज्याच्याकडे पैसा आहे, तोच विद्या ग्रहण करू शकतो. त्यामुळे अनेक हुशार मुले चांगल्या शिक्षणापासून वंचित होत आहेत. हिंदु राष्ट्रात ज्या प्रकारे पूर्वी गुरुकुलात विनामूल्य शिक्षण देऊन भौतिक विद्येसह आध्यात्मिक आणि नैतिक शिक्षण मिळून व्यक्तीला आदर्श व्यक्ती बनवले जात होते, त्याप्रमाणे शिक्षणपद्धत असेल.