पाक काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात !

  • ‘आय.एस्.आय.’कडून ‘ऑपरेशन रेड वेव्ह’ कार्यान्वित !

  • ३४ वर्षांपूर्वीच्या ‘ऑपरेशन टुपॅक’च्या धर्तीवर षड्यंत्र !

नवी देहली/श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या हिंदूंच्या ‘टार्गेट किलिंग’ (हिंदूंना वेचून ठार मारणे) मागे पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आय.एस्.आय.’चा कट असल्याचे उघड झाले आहे. भारताला पाकच्या या कारस्थानाचे पुरावेही मिळाले आहेत. (पुरावे मिळवून काय उपयोग ? यामागे पाक असल्याचे जगजाहीर आहे. त्यामुळे भारताने आता त्याच्यावर आक्रमण करणेच आवश्यक आहे ! – संपादक) ३४ वर्षांपूर्वी, म्हणजे वर्ष १९८८ प्रमाणे या वेळीही पाककडून काश्मीर खोरे हादरवून सोडण्याची योजना आखण्यात आली आहे. ही योजना सप्टेंबर २०२१ मध्ये बनवण्यात आली होती. याला ‘ऑपरेशन रेड वेव्ह’ असे नाव देण्यात आले आहे. दुसरीकडे ‘काश्मीर फ्रीडम फायटर’ या स्थानिक आतंकवादी संघटनेने ‘सर्वांचा शेवट सारखाच होईल’, अशी धमकी देणारे पत्र नुकतेच प्रसारित केले आहे.

सप्टेंबर २०२१ मध्ये आय.एस्.आय. अधिकारी आणि आतंकवादी संघटन यांच्या नेत्यांमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे बैठक झाली होती. यामध्ये काश्मीर खोर्‍यातील २०० लोकांना ठार मारण्याची योजना आखण्यात आली होती. ‘ऑपरेशन रेड वेव्ह’ हे वर्ष १९८८ च्या ‘ऑपरेशन टुपॅक’च्या धर्तीवर राबवण्यात येत आहे.

काश्मीर खोर्‍यात २२ दिवसांत ९ जणांचा बळी !

या वर्षी काश्मीरमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणांमध्ये आतापर्यंत २० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी गेल्या २२ दिवसांत ९ हत्या झाल्या आहेत, ज्यामध्ये ५ हिंदू आणि सुरक्षा दलांचे ३ सैनिक यांचा समावेश होता.

काय होते ‘ऑपरेशन टुपॅक’ ?

वर्ष १९८८ मध्ये ‘इंडियन मुजाहिदीन’सह ६ आतंकवादी संघटनांनी आय.एस्.आय.च्या सहकार्याने काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन टुपॅक’ चालू केले होते. ते वर्ष १९९० पर्यंत चालले. या कारवाईत ३०० हून अधिक काश्मिरी हिंदूंना वेचून ठार मारण्यात आले. त्यामुळेच लाखो काश्मिरी हिंदूंना काश्मीर खोर्‍यातून पलायन करावे लागले होते. पाकचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झिया उल् हक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

  • तत्कालीन काँग्रेस सरकारने हिंदूंच्या वंशविच्छेदाचा पाकचा प्रयत्न कठोर कारवाई करून तेव्हाच उधळून लावला असता, तर आज आतंकवाद्यांचे हिंदूंकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे धाडस झाले नसते ! पाकच्या कुकृत्याची पुनरावृत्ती कायमची टाळण्यासाठी विद्यमान सरकारने तरी पाकवर आक्रमण करून त्याला नष्ट करणे आवश्यक आहे !
  • भारतासह जगभरातील हिंदूंच्या रक्षणासाठी आता तरी हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !