हिंदूंची मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदींना हटवण्यासाठी हिंदूंचा लढा चालूच रहाणार !

‘मंदिर जितके जुने, तितकीच मशीदही जुनी’, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी काशीतील ज्ञानवापी प्रकरणावर केले. असे असले, तरी ती कितीही जुनी असली, तरी ज्ञानवापी मशिदीचा डोलारा हिंदु मंदिराच्या सहस्रो वर्षांपूर्वीच्या भग्नावशेषावरच उभा असल्याचे सांगायला पवार मात्र विसरले. याचे कारण म्हणजे मशिदीची बाजू घेतली तरच शरद पवारांना मुसलमानांची मते मिळणार आणि त्यांचे दाढीकुरवाळू राजकारण चालणार; पण आपण हिंदूंनी मात्र ज्ञानवापी मशीद मंदिराच्या सांगाड्यावरच उभी असल्याचे कधीही विसरता कामा नये. शरद पवारांच्या मते हिंदूंनी त्यांच्या आराध्य देवतांची मुसलमानांकडून क्षणाक्षणाला होणारी दुर्दशा गूपचूप सहन करावी; म्हणूनच ते मशिदीची बाजू घेतांना दिसतात.

काशी विश्‍वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद

१. मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदींना हटवण्यासाठी हिंदूंचा न्यायालयीन लढा चालू राहील !

एकटी ज्ञानवापी मशीदच नव्हे, तर मथुरेतील ईदगाह मशीद ते मंगळुरूतील मलाली जुम्मा मशीद आणि पुण्यातील बडा शेख सल्ला-छोटा शेख सल्ला दर्ग्यासह देशभरातील सहस्रो मशिदी मंदिरांच्याच तोडलेल्या-फोडलेल्या मूर्ती, दगड, विटा, खांबांवर उभ्या आहेत. ‘त्या जुन्या आहेत म्हणून त्यांच्या बांधकामाचा बेकायदेशीर प्रकार खपवून घ्यावा’, असे नेत्यांचे म्हणणे आहे; पण तसे होणार नाही, हिंदूंचा गमावलेल्या मंदिरांसाठीचा संघर्ष अनादी काळापासून चालू आहे. त्यातील अयोध्येतील मंदिर पुन्हा मिळाले; पण बाकीची मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदींना हटवण्यासाठी हिंदूंचा लढा चालूच राहील आणि त्या त्या ठिकाणी न्यायालयीन मार्गाने मंदिरेच बांधली जातील.

२. भारत स्वतंत्र झाला, त्याच वेळी मशिदी आणि चर्च यांचे सर्वेक्षण करून मंदिरे पुन्हा उभारणे आवश्यक !

जगातल्या अनेक देशांवर परकियांनी आक्रमण केले. त्यानंतर तेथील धर्मियांची प्रार्थनास्थळे एकतर उद्ध्वस्त केली वा त्यांचे रूपांतर आपल्या धर्माच्या प्रार्थनास्थळात केले. कालांतराने परकियांची राजवट संपली आणि नंतर त्या त्या देशातील नेतृत्वाने आपापली प्रार्थनास्थळे पुन्हा उभी केली. ग्रीसमधील आर्टेनिस मंदिराचे रूपांतर ख्रिस्ती आक्रमकांनी चर्चमध्ये केले होते; पण ख्रिस्ती आक्रमकांची सत्ता संपल्यानंतर ग्रीकांनी चर्चच्या खुणा मिटवून आर्टेनिसचे मंदिर पुनर्स्थापित केले. भारतावरही प्रारंभी इस्लामी आक्रमक आणि नंतर ब्रिटीश यांनी राज्य केले. त्यानंतर वर्ष १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला, त्याच वेळी खरे तर देशातील मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदी आणि चर्च यांचे सर्वेक्षण करायला हवे होते. त्यांचे अस्तित्व संपवून तिथे पुन्हा मंदिरेच बांधायला हवी होती.

३. तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेला ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ म्हणजे धर्मांधतेला संरक्षण !

या देशात बाबर, अकबर अन् औरंगजेब यांची पिलावळ जशा आता आहेत, तशा तेव्हाही होत्या. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांत हिंदूंना आपली मंदिरे पुन्हा मिळवताच आली नाहीत. वर्ष १९९१ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने हिंदूंसह बौद्ध, जैन, शीख यांच्या धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारा ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ (धार्मिक प्रार्थनास्थळे कायदा) आणून इस्लामी आक्रमकांच्या धर्मांधतेला कायद्याने संरक्षण दिले; कारण त्या वेळी अयोध्येतील रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन ऐन भरात असल्याने हिंदू शक्ती एकवटलेली होती. विशेष म्हणजे हिंदू वैध मार्गानेच आंदोलन करत असल्याने त्यांच्याकडून आणखी मंदिरे मुक्त करण्याची मागणी पुढे येऊ नये, म्हणून काँग्रेसने बहुमताच्या जोरावर तो कायदा आणला. आज त्याच कायद्याला आव्हान देण्यात येत आहे.

४. रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात दाखवल्याप्रमाणे हिंदूंनी देशातील सहस्रो मंदिरांसाठी त्यांचे संघटन दाखवावे !

हिंदू स्वतःच्या न्याय्य आणि हक्क यांची मागणी करत असतांना त्यावर काँग्रेससह अन्य कुणीही विरोधक बोलत नाही, म्हणजेच मुसलमानांच्या भावना जपण्यासाठी तो कायदा आणणारे आजही हिंदूंच्या भावनांकडे लक्ष देऊ इच्छित नाहीत, हेच यातून स्पष्ट होते. असे असले, तरी हिंदू आता गमावलेले सारे काही परत मिळवण्याच्या त्वेशाने पुढे सरसावलेले आहेत. अयोध्येतील रामजन्मभूमी मुक्तीसाठी जशी एकी हिंदूंनी दाखवली, तशी एकी आता देशातील सहस्रो मंदिरांसाठी दाखवली जात आहे आणि त्याचीच खंत मुसलमानांचे अखंड लांगूलचालन करणाऱ्या नेत्यांना वाटते. हिंदू आज काशी विश्वनाथाला दुरवस्थेतून बाहेर काढण्यासाठी आणि सन्मानाने प्रतिष्ठापित करण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत आहेत.

५. असदुद्दीन ओवैसी यांनी दोन धर्मांत तेढ निर्माण करून दंगली भडकवण्यासाठी वक्तव्य करणे !

असदुद्दीन ओवैसी

आजच्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी न्यायालयीन लढाईसाठी विरोध केला, तरी ती थांबणार नाही. हिंदूंना करण्यात येत असलेल्या विरोधामध्ये ‘एम्.आय.एम्.’चे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ‘बाबरी मशीद गमावली; पण आम्ही ज्ञानवापी मशीद गमावणार नाही’, असे म्हटले आहे. आता ज्ञानवापी प्रकरणाचा औरंगजेबाशी संबंध जोडण्यावरून ओवैसी यांनी ‘मोगलांशी भारतातील मुसलमानांचे कोणतेही नाते नाही; पण मोगल बादशहांच्या बायका कोण होत्या ? हे सांगा’, असे म्हटले आहे. त्यांचा रोख मोगल बादशहांच्या बायका हिंदू होत्या, याकडे होता; पण मोगलांच्या बायकांचा इतिहास काढला, तर ओवैसींसारखे कितीतरी इस्लामी कट्टरपंथी त्यांचेच विकृत वारस निघतील. त्यामुळेच अकबरुद्दीन ओवैसी  (असदुद्दीन ओवैसी यांचे भाऊ) औरंगजेबाच्या थडग्यावर माथा टेकवण्यासाठी गेले.

त्याही पुढे सांगायचे, तर असदुद्दीन ओवैसींनी ‘हिंदू महिला मोगलांच्या बायका कशा झाल्या ?’, हे आधी सांगितले पाहिजे. तलवारीच्या जोरावर जिहादी शिकवणीनुसार उपभोगासाठी बायकांची पळवापळवी इस्लामी आक्रमकांनी केली. यातून असदुद्दीन ओवैसींना हिंदूंचा मानभंग करतांना ‘आम्ही तुमच्या देशाचे, तुमच्या बायकांचे मालक होतो’, हे सांगायचे आहे. त्यांना देशातील दोन धर्र्मांत तेढ निर्माण करून दंगली भडकवायच्या आहेत. ‘तुम्ही मोगलांप्रमाणे हिंदूंच्या बायका करा’, अशी चिथावणी मुसलमानांना द्यायची आहे. अशा ओवैसीरूपी दुष्प्रवृत्तींना त्याची हानी सोसावी लागेल, हेही नक्की !

(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)

संपादकीय भूमिका 

केवळ काशी, मथुरा येथील मंदिरे कह्यात घेण्यावर न थांबता अन्य मंदिरांसाठीही हिंदूंनी लढा देण्यासाठी संघटित व्हावे !