उथळ आणि राष्ट्रविरोधी !

संपादकीय

केंब्रिज विश्‍वविद्यालयात आयोजित ‘आयडियाज ऑफ इंडिया’ या चर्चासत्रात बोलतांना राहूल गांधी

ज्या देशाने भारतावर दीडशे वर्षे राज्य करून, त्याची दुर्दशा करून त्याला गुलाम बनवले; अत्यंत समृद्ध आणि सोन्याचा धूर निघणार्या या देशातील सर्वच क्षेत्रांतील मूळ व्यवस्था उद्ध्वस्त करून त्याला अधोगतीच्या खाईत ढकलले; ज्यांनी भारताची गुरुकुल पद्धत संपवून, त्याचा धर्मशिक्षणाचा कणा मोडून, त्याला पंगू करून पाश्चात्त्य कुसंस्कृतीची काठी हातात दिली; जहाज, कापड, शेती आदी सारेच उद्योग नियोजनबद्धरित्या नेस्तनाबूत करून त्याला दरिद्री बनवले; त्याची न्यायव्यवस्था दाबून स्वतःचे जुलमी कायदे थोपवले, त्या आणि त्या ब्रिटिशांशी या देशाच्या पहिल्या पंतप्रधानांची घनिष्ठ मैत्री होती. त्यांचाच पणतू आता त्याच देशात जाऊन भारतविरोधी गरळओक करत आहे. हा योगायोग नाही. येथील केंब्रिज विद्यापिठात आयोजित एका कार्यक्रमात मोदी आणि हिंदु द्वेष यांपोटी राहुल गांधी यांनी या देशाची प्रतिष्ठाच पणाला लावून देशविरोधी गरळओक केली. हे अत्यंत निषेधार्ह असून प्रत्येक भारतियाने याचा निषेध केला पाहिजे. ब्रिटन या घडीला जरी भारताचा तसा उघड शत्रू नसला, तरी भारताच्या सहस्रो क्रांतीकारकांना फाशी देणारा आणि भारताचे अपरिमित शोषण करून त्यांची ‘न भूतो न भविष्यती’ अशी सर्व प्रकारची हानी करणारा देश आहे, हे आम्ही कधीही विसरता कामा नये.

राष्ट्राभिमानशून्य राहुल गांधी

रशिया-युक्रेन युद्धकाळातील भारताने घेतलेल्या भूमिकेला भारतातीलच नव्हे, तर अनेक विदेशी तज्ञांनीही नावाजले. दोन्ही देशांना न दुखावता, कुणाचीही थेट बाजू न घेता; परंतु अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात मोदी शासन यशस्वी ठरले, हे पंतप्रधान मोदी यांच्या शासनाच्या परराष्ट्रनीतीचे यश होते. असे असतांना त्याविषयी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापिठात दिलेल्या मुलाखतीत नकारात्मक भाष्य करून राहुल गांधी यांनी स्वतःचे हसे करून घेतले. भारतीय अर्थव्यवस्थेविषयी बोलण्याची आणि तेही विदेशात जाऊन त्यावर भाष्य करण्याची राहुल गांधी यांची पात्रता तरी आहे का ? मुख्य म्हणजे विदेशात जाऊन देशातील महत्त्वाच्या गोष्टींवर प्रतिक्रिया देण्याचा अधिकार राहुल गांधी यांना कुणी दिला ? तेही ते कोणत्याही अंगाने देशाचे अधिकृत प्रतिनिधित्व करत नसतांना ! विदेशात जाऊन ‘भारताची स्थिती ठीक नाही, महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. उत्पादन वाढवून नोकर्या दिल्या पाहिजेत’, यांसारखी विधाने करून राहुल गांधी काय साध्य करत आहेत ? एवढेच नव्हे, तर भारतीय अर्थव्यवस्थेविषयी बोलतांना त्यांनी भिकेकंगाल पाक आणि बांगलादेश यांच्यासमवेत भारताची तुलना करून भारताचा अवमान केला अन् स्वतःचे हसे करून घेतले. ‘येत्या काळात भारताचा विकासदर ६.५ च्या आसपास रहाणार आहे’, असा तज्ञांचा अंदाज आहे. असे असतांना राहुल गांधी यांनी वरील भाष्य कशाच्या आधारावर केले ?

‘देशाचा ‘आत्मा’ (खरे स्वरूप) आता कुठे जागृत होत आहे’, असे हिंदूंना वाटत आहे. असे असतांना ‘देशाचा आत्मा मेला आहे’, अशी मुक्ताफळे गांधी यांनी या मुलाखतीत उधळली. निधर्मी काँग्रेसच्या या युवा नेत्याला (?) ‘आत्मा’ वगैरे शब्द वापरण्याचा काय अधिकार ? आणि तसा तो असेल, तर आत्म्याला अनुषंगिक हिंदु धर्मातील प्रत्येक गोष्ट त्याला मान्य असायला हवी. ज्या घराण्याची नाळ कधी या मातीशी जुळलीच नाही, जे येथील मातीतील सुसंस्कृतीचा सुगंध कधी अनुभवूच शकत नाहीत, ज्यांचे बीज कधी येथे रोवलेच गेले नाही, त्यांनी उगाच मोठे मोठे शब्द वापरून आणि वैचारिकतेचा आव आणून विदेशात

जाऊन भारतविरोधी वक्तव्ये करणे, हे भारतियांनी का म्हणून सहन करावे ? संत आणि द्रष्टे यांना येणार्या काळात भारताचे उज्ज्वल भविष्य दिसत असतांना राहुल गांधी यांना ‘भारत मेल्यासारखा वाटतो’, तर त्ो इटलीत आजोळी कायमचे खुशाल जाऊ शकतात. काही दिवसांपूर्वी ‘भारत एक राष्ट्र नाही’, अशी गरळओक त्यांनी केली होती. ब्रिटीश येण्यापूर्वी हिंदुकुश पर्वताच्या अलीकडील या भूमीवर अनेक राज्ये असली, तरी त्यांची संस्कृती आतून एकसंध होती. त्याचा संदर्भ आता देणे योग्य नाही. अमेरिकेप्रमाणे आपल्याला प्रत्येक राज्याचे नागरिकत्व घ्यावे लागत नाही. स्वातंत्र्यानंतर सर्व राज्ये एकाच देशाचा भाग आहेत. त्यामुळे ‘इंग्रजाळलेल्या राहुल गांधींचे अशा प्रकारचे अज्ञान ते कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचे आणि विदेशी शक्तींचे मिंधे झाल्यामुळे प्रगट होते कि काय ?’, अशी रास्त शंका येते.

नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या शिबिरात म्हणे ‘भारताला परत कसे मिळवायचे ? (हाऊ टू रिगेन इंडिया)’ यावर चिंतन झाले. म्हणजे त्यांना म्हणायचे आहे की, भाजपने भारत बळकावला आहे. राहुल गांधी हे विसरले की, सर्वांत मोठ्या लोकशाही देशातील जनतेने काँग्रेसची दुर्दशा झाल्याने बहुमताने आतापर्यंत २ वेळा भाजपला निवडून दिले आहे. त्यामुळे असे बोलणे हा त्या लोकशाहीतील सार्या जनतेचा अवमानच आहे. ज्याच्या पक्षातील निम्म्या लोकांना जो नेता म्हणून नको आहे, ज्याचा स्वतःचा वैचारिक गोंधळ आहे, त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भारतीय पंतप्रधानांना कितीही पाण्यात पाहिले, तरी त्याचा काही उपयोग नाही, हेही त्यांना कळत नाही.

‘भाजपने देशभर ‘केरोसीन’ पसरले आहे आणि कधीही ठिणगी पडू शकते’, असे राहुल गांधी केंब्रिज विद्यापिठात म्हणाले. ते उपहासाने म्हणाले असले, तरी भाजपने नव्हे; पण हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदुत्वाची लहर सर्वत्र देशभर पसरवली आहे, हे मात्र नक्की खरे आहे आणि त्याचे वादळ असेच मोठे होण्याची चिन्हे सध्याच्या स्थितीवरून दिसत आहेत. या वादळात देशातील दुष्प्रवृत्ती उलथवून टाकण्याची क्षमता बीजरूपाने दडलेली आहे, हे राहुल गांधींसारखे हिंदुविरोधक जाणत असल्यामुळेच ही अस्वस्था आता प्रकट होऊ लागली आहे. राममंदिर, काशी-मथुरा यानंतर ताजमहाल, कुतुबमिनार आणि हळूहळू अशा सर्वच झाकल्या गेलेल्या मंदिरांचे सत्य उजागर होण्याचा काळ जवळ येत आहे. त्यामुळे हिंदुविरोधकांना आलेली अस्वस्थता समजू शकते; परंतु देशाबाहेर जाऊन ती प्रकट करणे, हे केव्हाही स्वीकारार्ह नाही !

संपादकीय भूमिका

ब्रिटनमध्ये जाऊन भारतविरोधी गरळओक करणारे राहुल गांधी हे राष्ट्राभिमानशून्यच !