भाजपच्या ५ वर्षांच्या सत्ताकाळात फडणवीस यांनी ‘औरंगाबादचे संभाजीनगर’ नामकरण का केले नाही ? – चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते

संभाजीनगर – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना मी अनेकदा औरंगाबाद शहराच्या नामांतरासाठी त्यांना भेटलो होतो. त्यांनी सत्तेत असतांना औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर का केले नाही ?, असा प्रश्न करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी फडणवीस यांना १६ मे या दिवशी प्रत्युत्तर दिले. मुंबई येथे १५ मे या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या उत्तर सभेमध्ये शिवसेनेवर टीका केली होती.

चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले की, प्रत्येक वेळी मी ‘औरंगाबादचे संभाजीनगर’ नामांतर करण्यासाठी फडणवीस यांच्याकडे विनंती करायचो; मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ‘एम्.आय.एम्.’चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी आणि खासदार इम्तियाज जलील औरंगजेबाच्या कबरीवर गेले आणि ते तेथे नतमस्तक झाले; पण तरी त्यांच्यावर कारवाई झाली नाही. या वेळी त्यांनी भाजपवर टीकाही केली.

संपादकीय भूमिका

आक्रमकांची नावे हटवण्यासाठी राजकीय पक्षांनी संघटितपणे कृती करणे अपेक्षित !